Top Newsराजकारण

कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यावर स्वार होऊन राजकारण करणार नाही : पंकजा मुंडे

मला सत्तेची लालसा नाही, ...म्हणून तुमचे राजीनामे नामंजूर; 'नाराज' मेळाव्यात घोषणा

मुंबई : खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्र सुरू केलं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी समर्थकांशी संवाद साधला. मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मला कुणालाही राजकारण संपवून राजकारण करायचं नाही, असं सांगतानाच मी तुमच्या सर्वांचे राजीनामे फेटाळून लावत आहे, असं पंकजा मुंडे यांनी आज जाहीर केलं.

पंकजा मुंडे यांनी आज वरळीत पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करतानाच दिल्लीत नेमकं काय घडलं याचीही माहिती दिली. मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मी असुरक्षित नाही. मला कुणालाही संपवून राजकारण करायचं नाही. त्यामुळे मी तुमच्या सर्वांचे राजीनामे नामंजूर करत आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

मंत्रिमंडळ विस्तारात प्रितम मुंडे यांना स्थान न दिल्याने बीड जिल्ह्यासह राज्यभरात ७० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यानंतर आज हे समर्थक पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना भेटण्यासाठी मुंबईला आले होते. या कार्यकर्त्यांना पंकजा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कोरोनाच्या नियमांना हरताळ फासण्यात आला. यावेळी पंकजा यांना बोलताना माईकच्या तांत्रिक बिघाडाला बराच वेळ सामोरे जावे लागले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सामान्य कार्यकर्ते इथे आले आहेत. अनेक कार्यकर्ते त्यांच्या जिल्ह्यात आहेत. मार्गदर्शाची वाट पाहत आहेत. मुंडे साहेबांनी आयुष्यभर खस्ता खाऊन वंचितांना न्याय देण्याचे काम केले. तळागाळातील माणूस हा ग्राम पंचायत सदस्य ते आमदार,खासदार झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले. मुंडे साहेबांनी फक्त परळीची आमदारकी मिळवावी म्हणून राजकारणात आणले नाही. त्यांनी लढा दिलेल्या प्रस्थापितांविरोधात उभे करण्यासाठी मला राजकारणात आणले. मुंडे साहेबांनी मुलीला मंत्री करा, संत्री करा, या नातेवाईकाला करा, असे कधी म्हटले नाही. वडील राजकारणात असताना मी राजकारणात आले. त्यांच्या चितेला अग्नी देताना अनेक लोक मला ढकलत होते. अनेकांनी मुंडण केले. घोषणा देऊ नका, मला त्यातून ताकद जरूर मिळते, परंतू आज ते स्थान नाही.

माझे भांडण नियतीशी आहे, मुंडे साहेबांना दिलेली सत्ता या नियतीने खेचून घेतली. ती सत्ता खेचून आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असे मी म्हणाले होते. मुंडे साहेबांचे स्वप्न होते, भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा, ते स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून मी संघर्ष यात्रा काढली होती. राज्यातल्या नेत्यांनी केंद्रात प्रस्ताव पाठवला होता. पंकजा मुंडे यांना केंद्रात मंत्रीपद द्या, मी नाकारले, असे पंकजा म्हणाल्या. मग मी तुम्हाला राजीनामे द्यायला लावेन का, असा सवाल करत मी तुम्ही दिलेले राजीनामे नामंजूर करत आहे, अशी घोषणा पंकजा यांनी केली.

यावेळी पंकजा मुंडे यांनी दबावतंत्र करत नसल्याचं स्पष्ट केलं. मला दबाव तंत्र करायचं असेल तर ही ती जागा नाही. ही जागा पुरणार नाही. त्यासाठी वेगळी जागा लागेल, असं पंकजा म्हणाल्या. काल मी दिल्लीत गेले होते. पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा झाली. तुम्ही कार्यकर्त्यांना समजवाल हे त्यांनी सांगितलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला झापल्याच्या बातम्या आल्या. मी फटकार खावून तुमच्यापुढे आली असेल असं वाटतं का?, असा सवालही त्यांनी केला.

थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा?

पंकजा मुंडेंनी यावेळी काही सूचक विधाने केली तर काही रोखठोक भाष्य केलं. आम्ही कुणालाच घाबरत नाही, मी कुणाचा निरादार करत नाही. माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी थेट मोदी-शाहांचं नाव घेऊन राज्यातील नेत्यांना डावलल्याची खास करुन देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा, राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू

पंकजा मुंडे म्हणाल्या, “आपली शक्ती कमी करण्याचा डाव आहे, पण आपण हा डाव पूर्ण होऊ द्यायाचा नाही. मला पुढेही खडतर मार्ग दिसतो आहे. योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. आपण वारकरी आहोत, सात्विक आहोत. ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू”

धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न

पाच पांडव का जिंकले कारण त्यांच्याकडे संयम होता. जो चांगला असतो तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तेव्हापर्यंत करते जेव्हा पर्यंत शक्य आहे. आम्ही कुणालाच भीत नाही. मी कुणाचा निरादार करत नाही. मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाचा आदर करते. मला स्वतःसाठी काही नको, मला तुमच्यासाठी हवं आहे. मी पदावर नाही. मी आज तुमच्या पालकत्वाच्या भूमिकेत आहे. मला कशाचीही आवश्यकता नाही, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

चिल्लर गोष्टीवर मी जात नाही

काळ कधीच थांबत नाही. मी दुःखी नाही. मला काही मिळालं नाही मिळालं एवढ्या चिल्लर गोष्टीवर मी जात नाही. आपली नीतीमत्ता चांगली आहे. आज आपण धर्मयुद्ध टाळण्यासाठी इथे आहोत. अर्जुन, युधिष्ठराने तो प्रयत्न केला. मला आई आणि बापाच्या भूमिकेतून निर्णय घ्यावे लागतात, असं म्हणत पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना धीर दिला.

तुमचं पद मला प्रीतम ताईंच्या मंत्रिपदापेक्षा जास्त महत्वाचं आहे. आपलं घर आपण सोडायचं नाही. पंतप्रधान मोदींसाठी घोषणा द्या. त्यांना ऐकू जाईल एवढं मोठ्यांनी घोषणा द्या. माझ्या माणसांचे तुकडे पाडण्याचे अनेक प्रयत्न केले, पण ते सफल होऊ देऊ नका, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button