
मुंबई: १०२ व्या घटना दुरुस्तीच्या मुद्द्यावरून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपला घेरलं आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, बाळू धानोरकर, शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या संसदेतील आरक्षणाच्या लढाईतील योद्धे आहेत, असं सांगतानाच या निमित्ताने भाजपची दुतोंडी भूमिका उघड झाली आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.
अशोक चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रक काढून ही टीका केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल व्यवस्थित वाचला पाहिजे. ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्याची मागणी ही सबब नाही. याच आरक्षण मर्यादेमुळे मराठा आरक्षण फेटाळले गेले, ही वस्तुस्थिती आहे. शिवाय ही मागणी राज्याने आता केलेली नसून मागील अनेक महिन्यांपासून आम्ही याबाबत सातत्याने बोलतो आहोत. संसदेत राज्यांचे मागासलेपण निश्चित करण्याचे अधिकार पुन्हा बहाल केले जात असताना त्याचवेळी ही मर्यादा देखील शिथिल करावी, अशी मागणी महाविकास आघाडीने लावून धरली, असं चव्हाण म्हणाले.
५० टक्के मर्यादेची अट शिथिल करावी या मागणीसाठी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे, खासदार अधिर रंजन चौधरी, डॉ. अभिषेक मनू सिंघवी, बाळू धानोरकर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, विनायक राऊत, प्रतापराव जाधव, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण यांनी भक्कमपणे बाजू मांडली. मराठा आरक्षणाच्या संसदेतील लढ्याचे ते योद्धे आहेत, असं सांगतानाच खासदार संभाजी छत्रपती यांचा अपवाद वगळता भाजपचे इतर खासदार हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बसले होते. लोकसभा व राज्यसभेत काय घडले, ते उभ्या महाराष्ट्राने टीव्हीवर पाहिले. आता भाजपने मराठा समाजाची कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी ते त्याला बळी पडणार नाहीत, असे चव्हाण म्हणाले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. चव्हाण म्हणाले की, भाजपच्या या दोन्ही नेत्यांना आता मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांना अधिकार राहिलेले नसताना तत्कालीन भाजप सरकारने मराठा आरक्षण दिले, हे सिद्ध झाले आहे. शिवाय ती चूक आता दुरुस्त होत असताना ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत महाराष्ट्रातील भाजप खासदारांनी चकार शब्दही काढला नाही. खा. संभाजीराजे यांनी याबाबत राज्यसभेत बोलण्यासाठी वेळ मागूनही दुर्दैवाने त्यांना वेळ देण्यात आली नाही. शेवटी विरोधी पक्ष आक्रमक झाले व त्यानंतर त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली. या साऱ्या प्रकारातून मराठा आरक्षणाबाबत भाजपची दुतोंडी भूमिका उघडी पडली आहे.




