राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

मुंबई : देशासह राज्यात कोरोना विषाणुच्या दुसऱ्या लाटेतील वाढत्या रुग्णसंख्येचा ताण राज्यातील आरोग्य यंत्रणेला सहन करावा लागत आहे. यात राज्यात बुधवारी ४६ हजार ७८१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८१६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के आहे. राज्यात बुधवारी ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातल्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ४६ लाख १९६ इतकी झाली आहे. तर राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ८८.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे राज्यातल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ५ लाख ४६ हजार १२९ वर पोहोचली आहे.
महाराष्ट्रात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,०१,००,९५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५२,२६,७१० (१७.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६,१३,००० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,४१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज नोंद झालेल्या एकूण ८१६ मृत्यूंपैकी ३८७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २३६ मृत्यू, पुणे- ४६, नागपूर- २७, बीड- २२, नाशिक- २१, जालना- १६, नांदेड- ११, भंडारा- १०, अहमदनगर- ९, चंद्रपूर- ८, सोलापूर- ८, ठाणे- ८, औरंगाबाद- ५, रत्नागिरी- ५, वाशिम- ५, कोल्हापूर- ४, लातूर- ४, गोंदिया- ३, हिंगोली- ३, जळगाव- ३, पालघर- ३, सातारा- ३, गडचिरोली- २, उस्मानाबाद- २, परभणी- २, रायगड- २, अकोला- १, धुळे- १, सांगली- १ आणि सिंधुदुर्ग- १ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
आजही राज्यातील सर्वाधिक रुग्णांची नोंद ही पुण्यात झाली आहे. बुधवारी पुण्यात ४ हजार ३६३ वर पोहोचली असून त्याखालोखाल पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार १५२ नव्या बाधितांची नोंद झाली. तर मालेगाव क्षेत्रात सर्वात कमी म्हणजे १० नव्या बाधितांची नोंद झाली. दरम्यान मुंबई आज सर्वाधिक मृत्यूंची म्हणजेच ६६ कोरोनाबाधित मृतांची नोंद झाली.




