‘आता वेळ जगाचा निरोप घेण्याची!’; सचिन वाझेंचं धक्कादायक व्हॉटस्अॅप स्टेटस

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणातील संशयित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या व्हॉटस्अॅप स्टेटसने खळबळ उडवून दिली आहे. सहकाऱ्यांना दोष देत त्यांनी जगाचा निरोप घेत असल्याचे आपल्या स्टेट्समध्ये म्हटले आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आल्यानंतर एटीएसने मनसूख हिरेन यांच्या पत्नीच्या तक्रारीवरुन अज्ञात इसमाविरुद्ध हत्या, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न तसेच कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे.
या प्रकरणात एटीएसने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर वाझे यांच्या भोवती फास आवळण्यात आला आहे. दरम्यान अटकेच्या भीतीने १२ मार्चला वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र अटकपूर्व जामिनासाठी अर्जावर 19 मार्चला सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणात सचिन वाझे यांना एटीएसकडून संशयित म्हणून अटक करण्यासाठीची लगबग सुरु झालेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान सचिन वाझे यांनी स्वतःच्या व्हॉटस्अॅपवर ठेवलेल्या स्टेट्सने शनिवारी खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी आपल्या स्टेट्सवर सहकाऱ्यांवर आरोप केले आहेत. या स्टेटसमध्ये त्यांनी लिहिले की, 3 मार्च 2004 रोजी सीआयडीतील माझ्या सहकारी अधिकाऱ्यांनी मला खोट्या प्रकरणात अटक केली. ती केस अजूनही न्यायप्रविष्ठ आहे. मात्र आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. माझे सहकारी अधिकारी आता पुन्हा मला चुकीच्या पद्धतीने अडकवण्यासाठी सापळा रचत आहेत. तेव्हाच्या घटनेत आणि आताच्या घटनेत थोडा फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे संयम, आशा, आयुष्य आणि सेवेची 17 वर्ष होती. आता मात्र माझ्याकडे ना आयुष्याची 17 वर्ष आहेत, ना सेवेची. ना जगण्याची आशा. जगाचा निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली.” असे धक्कादायक स्टेटस सचिन वाझेंनी आपल्याला व्हॉटस्अॅपला ठेवले आहे.