
मुंबई: भाजपचे खा. नारायण राणे यांच्या या टीकेनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संभाजीराजे ट्विट करत म्हणाले की, छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकदच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही. त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू.
ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 4, 2021
खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यात धमक दिसत नाही. ते राजे आहेत म्हणून त्यांना खासदारकी दिली. मात्र ते राजे असतील तर रयत दिसली पाहिजे ना आजूबाजूला. ती कुठे दिसत नाही, अशी टीका भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली होती. छत्रपती संभाजीराजे यांच्यात धमक दिसत नाही. खासदारकीची मुदत संपत आली की आंदोलनाची, राजीनामा देईन, पक्ष काढेन अशी भाषा सुरु होते. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन आरक्षण मिळत नाही आणि असं पुढारी होत नसतात. राजे हे समाजानं म्हणावं लागतं. राजे फिरताहेत पण रयत दिसत नाही आजूबाजूला. पण खासदारकी संपता संपता हे सगळे एकदम कसे आठवायला लागले. मला त्यांचा मुद्दा पटला तर मी जाईन. पण जनतेला वाटले पाहिजे की ते आपले राजे आहेत, असं नारायण राणे पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले होते.




