
हेडींग्ले : लॉर्ड्स कसोटीतील नायक तिसऱ्या कसोटीत धाडकन आपटले… नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला अन् इंग्लंडचा कर्णधार जो रूट याच्या चेहऱ्यावर आनंदाचा तेज झळकला. जणू विराट चुकला, हे त्याला तेव्हाच माहित पडले होते आणि त्याची प्रचिती पहिल्या षटकापासून आली. ३९ वर्षीय जेम्स अँडरसननं पहिल्या स्पेलमध्ये ८ षटकांत ३ महत्त्वाच्या विकेट्स घेत जबरदस्त धक्का दिला. त्यातून टीम इंडिया सावरलीच नाही आणि संपूर्ण संघ ७८ धावांत तंबूत परतला. रोहित शर्मानं सर्वाधिक १९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या फलंदाजांनीही जबरदस्त खेळ केलाय.
इंग्लंडनं आजच्या कसोटीत सलामीला हसीब हमीद आणि रोरी बर्न्स ही नवी जोडी उतरवली अन् त्या दोघांनी संयमी खेळ करताना इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी भागीदारी करताना एक वेगळा विक्रमही नोंदवला. भारताच्या पहिल्या डावातील धावांचा पल्ला प्रतिस्पर्धी सलामीरांनी पार करण्याची ही २०११/१२नंतरची पहिलीच वेळ ठरली. पर्थ कसोटीत डेव्हिड वॉर्नर आणि एक कोव्हन यांनी टीम इंडियाच्या १६१ धावांच्या प्रत्युत्तरात पहिल्या विकेटसाठी २१४ धावांची भागीदारी केली होती. हमीदनंतर बर्न्सनेही अर्धशतक पूर्ण केले. इंग्लंडनं पहिल्या दिवसअखेर बिनबाद १२० धावा करत ४२ धावांची आघाडी घेतली आहे. हमीद ६०, तर बर्न्स ५२ धावांवर नाबाद आहेत.
दरम्यान, हेडिंग्ले कसोटीतील पहिला दिवस इंग्लंडच्या नावावर राहिला. रोहित शर्मा ( १९), लोकेश राहुल ( ०), चेतेश्वर पुजारा ( १), विराट कोहली ( ७), अजिंक्य रहाणे ( १८), रिषभ पंत ( २), रवींद्र जडेजा ( ४), मोहम्मद शमी ( ०), जसप्रीत बुमराह ( ०) व मोहम्मद सिराज ( ३) अशी टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली. जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हर्टन यांनी प्रत्येकी तीन, ऑली रॉबिन्सन व सॅम कुरन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. ३९ वर्षीय गोलंदाज जेम्स अँडरसननं पहिल्याच षटकात टीम इंडियाला मोठा धक्का दिला. त्यानंतर त्यानं आणखी दोन फलंदाजांना माघारी पाठवून टीम इंडियावरील दडपण वाढवले.
कसोटीत विराट कोहली व रोहित ही जोडी प्रथमच सोबत खेळताना दिसली, परंतु त्यांना मोठी भागीदारी करता आली नाही. विराट ( ७) अँडरसनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. अँडरसनच्या तडाख्यानंतर ऑली रॉबिन्ससन २ धक्के दिले. रोहित व अजिंक्य यांनी ९२ चेंडूंत केलेली ३५ धावांची भागीदारी ही टीम इंडियासाठी सर्वोत्तम ठरली.१०५ चेंडू खेळून १९ धावा करणाऱ्या रोहितची महत्त्वाची विकेट ओव्हर्टननं घेतली. पुढच्याच चेंडूवर मोहम्मद शमीही माघारी परतला. सॅम कुरननं पुढच्याच षटकात सलग दोन धक्के दिले. भारताचे तळाचे पाच फलंदाज अवघ्या ११ धावांवर माघारी परतले.




