नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का

काठमांडू : भारताचा शेजारी नेपाळ आज पहाटे भूकंपाच्या धक्क्याने हादरले. नेपाळमध्ये रिश्टर स्केलवर ५.८ तीव्रतेचा भूकंपाची नोंद झाली आहे. नॅशनल अर्थक्वीक मॉनिटरिंग अँड रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, भल्यापहाटे हा भूकंपाचा धक्का जाणवला. सुदैवाने, अद्याप कुठेही जीवितहानी झाली नाही.
भूकंपाचे धक्के हे काठमांडूपासून उत्तर-पश्चिमपासून ११३ किमी दूर अंतरावर पहाटे ५:४२ च्या सुमारास जाणवले. भूकंपाचे केंद्रबिंदू हे लामजुंग जिल्ह्यातील भुलभुले इथं होतं. या भूकंपाची तीव्रता ही ५.८ इतकी नोंद झाली आहे. फेब्रवारी महिन्यात सुद्धा नेपाळमधील लोबुयामध्ये भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला होता. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ५.२ नोंद झाली होती. फेब्रुवारी महिन्यातच भारत-नेपाळ सीमेवर ४.० तीव्रतेचा भूकंप आला होता. तर मागील एप्रिल महिन्यात सिक्किम नेपाळ सीमेवर ५.४ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली होती. या भूकंपाचे धक्के आसाम, बिहार आणि पश्चिम बंगालला सुद्धा जाणवले होते.




