
नांदेड : राज्यातील सत्ताधारी असलेली महाविकास आघाडी आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू असते. दरम्यान, देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान, राज्यातील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे. सुभाष साबणे यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेमध्ये महाविकास आघाडीवर घणाघाती हल्ला करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारला काहीही झालं की केंद्र सरकारवर ढकलण्याची सवय लागली आहे, आता यांना बायकोनं मारलं तरी हे केंद्र सरकारनं मारलं म्हणून सांगतील, असा टोला लगावला.
प्रचारसभेत फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार कुठे कुठे भ्रष्टाचार करतील याचा भरवसा नाही. नेते बोलायला बांधावर जातात, मोठ्या घोषणा करतात. मात्र मदत मिळत नाही. पिकविम्याचे पैसेही शेतकऱ्यांना मिळू शकलेले नाहीत. महाविकास आघाडी सरकारमधील लोक एवढे लबाड आहेत की काहीही झालं तरी केंद्र सरकारवर ढकलतात.
खरं म्हणजे ही पोटनिवडणूक झाली नसती तर चांगले झाले असते. मात्र, या निवडणुकीमुळे राज्य सरकारच्या कारभारावर नापसंती व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. गेल्या दोन वर्षांत राज्य सरकारने केवळ भ्रष्टाचार केला. फक्त छपाई आणि पैसे कमावण्याचा उद्योग सुरू केला आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.