राहुल गांधींच्या मतदारसंघातील काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा

वायनाड: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेससाठी एकामागून एक धक्क्यांची मालिका सुरूच आहे. पंजाबमध्ये मोठी राजकीय उलथापालथ घडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या वायनाड या लोकसभा मतदारसंघातील एका बड्या नेत्याने राजीनामा दिला असून, गेल्या ५२ वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. राहुल गांधींसाठी हा मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे.
वायनाड येथील माजी जिल्हा काँग्रेस कमिटीचे (डीसीसी) अध्यक्ष पीव्ही बालचंद्रन यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. याशिवाय केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) कार्यकारी समिती सदस्य बालचंद्रन यांनी बहुमत आणि अल्पसंख्यांक दोन्ही समुदाय काँग्रेसपासून दूर जात असल्याचे सांगत पक्षाशी ५२ वर्षे असलेला संबंध संपवला. यावेळी बालचंद्रन यांनी काँग्रेसवर मोठे आरोप केले आहेत.
देशातील भाजपाचा विकास रोखण्यात सर्वांत जुना पक्ष अपयशी ठरल्याचा आरोप बालचंद्रन यांनी केला आहे. दिशा गमावलेल्या पक्षासोबत लोक उभे राहणार नाहीत, असा दावा करत काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाच्या कार्यशैलीवरही त्यांनी टीका केली. लोकांना प्रभावित करणाऱ्या मुद्यांवर ते स्पष्ट राजकीय भूमिका घेण्यास सक्षम नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेसला कार्यकर्त्यांच्या भावनांनुसार काम करता येणार नाही असे वाटत असल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, असे बालचंद्रन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, वायनाडमध्ये काँग्रेसमध्ये होत असलेल्या राजीनाम्यांच्या मालिकेत बालचंद्रन यांचे नावही जोडले गेले असून, माजी आमदार के.सी. रोसाकुट्टी, केपीसीसी सचिव एमएस विश्वनाथन आणि डीसीसी सरचिटणीस अनिल कुमार यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष सोडला होता. बालाचंद्रन यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय हा सध्याच्या काँग्रेस नेतृत्वालाही धक्का देणारा असल्याचे सांगितले जात आहे.




