राज्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन! उद्या सर्वपक्षीय बैठकीत निर्णय होणार
मुंबई : राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच असल्यामुळे राज्य सरकारकडून पुन्हा संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत उद्या (शनिवारी) दुपारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. कडक निर्बंध लादूनही परिस्थिती बदलत नसल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील उपाययोजनांबाबात उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे सरकार आता राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी जी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, त्या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.