
मुंबई: कोरोनाची दुसरी लाट बहुतांश प्रमाणात ओसरल्याचे चित्र असल्यामुळे मुंबई, पुण्यासह राज्यातील निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंता वाढली असून, पुन्हा एकदा काही प्रमाणात निर्बंध लावण्याची तयारी करण्यात आली आहे. आताच्या घडीला महाराष्ट्रात ८ सह देशभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे २१ रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरोना प्रतिबंधक लसीच्या बुस्टर डोसबाबत केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन अजित पवार यांनी अभिवादन केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व प्रथम विनम्र अभिवादन करतो. त्यांनी सांगितलेला विचार समता, एकता बंधुता, सर्वधर्मसमभाव या विचारानीच देश पुढे जाऊ शकतो. हे अनेकदा आपल्या सर्वांच्या पाहण्यात आहे. त्यामुळे या विचारानेच देशाला पुढे न्यायचे आहे.
ज्यांनी दोन डोस घेतले होते त्यांनाच याची बाधा झाल्याचे दिसत आहे. तर मग बूस्टर डोसची गरज आहे का? आपल्याकडे डोस उपलब्ध आहेत. त्यासंबंधी देश पातळीवर निर्णय झाला पाहिजे असे वाटते. बुस्टर डोससंबंधी जी चर्चा सुरु आहे, त्याबद्दल वेगवेगळा मतप्रवाह आहे. तो द्यायचा की नाही याबद्दल काहीतरी उत्तर दिले पाहिजे. त्यासंबंधी तज्ज्ञ लोकच सांगू शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रशासनातील सर्वांचे यावर बारकाईने लक्ष आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये बाहेरचे जे रुग्ण येतात, त्यासंबंधी केंद्र सरकारनेही कठोर भूमिका घेतली पाहिजे. जिथे जिथे आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत तिथे नियमांचे पालन अतिशय काटेकोरपणे होते की नाही हेदेखील पाहिले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, काल परवा राजकीय लोकांच्या घरातील लग्न झाली. लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. आपण यापूर्वी पाच ते सहा फुटांचे अतंर ठेवत होतो. मास्क काढला तरी संसर्ग होत होता. आता ओमायक्रॉनबाबत देशपातळीवर निर्णय घेण्याची गरज आहे. लहान मुलांच्या लसीकरणाबद्दल केंद्र सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेने भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.




