यवतमाळपाठोपाठ अमरावती जिल्हाही लॉकडाऊन, औरंगाबादेत शाळा बंद
यवतमाळ: कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे अखेर यवतमाळ जिल्हा पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दहा दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे यवताळमध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतला आहे.
दरम्यान, कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने अमरावती जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे, अमरावती जिल्हा रविवारी बंद राहील,केवळ अत्यावश्यक सेवा राहतील सुरू, अशी माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे. दरम्यान औरंगाबादमध्येही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसद या तीन ठिकाणी सर्वाधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. रुग्णसंख्या वाढणाऱ्या तीन ठिकाणाहून प्रतिदिन प्रत्येकी ५०० याप्रमाणे दिवसाला १५०० नमुन्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने मृत्यू होण्याची कारणे, याबाबत विश्लेषण करून डेथ ऑडीट रिपोर्ट अधिष्ठाता यांनी सादर करावा. सोबतच खाजगी रुग्णालय येथे कोरोनामुळे मृत्यू होण्याची कारणे याबाबत ऑडीट रिपोर्ट जिल्हा शल्य चिकित्सकांनी सादर करावे, असे निर्देश दिले आहेत. हाय -रिस्क, लो-रिस्कनुसार लॉकडाऊन राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.