
नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसतेय. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. मात्र नागरिक कोणची पर्वा न करता सार्वजनिक ठिकाणी, पर्यटनस्थळी, बाजारपेठांमध्ये, कार्यक्रमांमध्ये वावरताना दिसत आहे. त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्रालयाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध पुन्हा लागू करण्याच्या सूचना राज्यांना दिल्या आहेत.
राज्यांचे मुख्य सचिव आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने पत्र पाठवत कोरोना संबंधिचे नियम पाळण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी ठरवलेले मानक व एसओपी लागू केले पाहिजेत. सार्वजनिक ठिकाणे आणि बाजारपेठांमध्ये होत असलेल्या गर्दीवर लक्ष ठेवले पाहिजे आणि बेजबाबदारपणा असेल तिथे परिस्थितीनुसार कडक कारवाईचे निर्देश गृहमंत्रालयाने दिले आहेत.
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ३२ हजार ९०६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर २०२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आतापर्यंत ४ लाख १० हजार ७८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच, काल दिवसभरात ४९ हजार ०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९७.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे.




