
महाविकास आघाडी सरकारमध्ये खदखद असल्याची चर्चा सातत्याने जोर धरत असतानाच आता संजय राऊत यांच्या लेखामुळे आघाडी सरकारमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांना राज्याचे गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले, अशी टिप्पणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या लेखातून केल्याने आघाडीच्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.आघाडी सरकार स्थापन झाल्या पासूनच अनेक मुद्द्यावरून तीन पक्षांमधील वाद अधून मधून उफाळून येत असतो.वाझें व देशमुख प्रकरणामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी मधील तिन्ही पक्ष आमने सामने आले असून वाझें व देशमुख प्रकारणांमुळे सरकारची प्रतिमा मलीन झाली आहे.
शरद पवार यांनी मात्र आघाडी सरकार मध्ये मतभेद नसल्याचे सांगत कथित वक्तव्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहे. महाआघाडीमध्ये कोणत्याही प्रकारची बिघाडी नसल्याचेही स्पष्ट केले. शरद पवार यांनी स्पष्ट केले.आघाडीतील बिघडीच्या या अफवाअसून या अफवा त्यांनी फेटाळून लावल्या. पवार म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये कोणतीही बिघाडी नाही.उद्धव ठाकरे सरकारच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील आघाडी सरकार योग्य पद्धतीने काम करत आहे. महाष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनी मिळून सरकार स्थापन केले. तेव्हापासूनच या आघाडी सरकार कोसळणार अशी चर्चा सुरू होती. एकीकडे शरद पवार आघाडी सरकारमध्ये मतैक्य असल्याचे म्हणत असले तरी त्यांच्याच पक्षाचे अजित पवार जे की उपमुख्यमंत्री आहेत.त्यांनी राउतांना अप्रत्यक्ष टोला लगावताना अजित पवार यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. कोणत्याही नेत्याने महाविकासआघाडीत मीठाचा खडा टाकू नये, असे वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना अप्रत्यक्षपणे सुनावले आहे.
अनिल देशमुख यांना राज्याचे गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले, अशी टिप्पणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. राऊत यांचे नाव न घेता अजित पवार यांनी हे प्रत्युत्तर दिले जात आहे. बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी हे भाष्य केले आहे. महाविकास आघाडीचे हे तीन पक्षांचे सरकार आहे. कुणाला मंत्री बनवायचे हा तिन्ही पक्षाच्या प्रमुखांचा अधिकार आहे. राष्ट्रवादीत कोणाला मंत्री करायचे हा शरद पवार यांचा अधिकार आहे. आमचे तीन पक्षाचे सरकार आहे हे लक्षात घेऊन या पक्षांशी संबंधित व्यक्तींनी एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री कोण असावेत, मंत्री कोण असावेत याबाबत निर्णय घेतले आहे. त्यामुळे महाविकासआघाडी एकत्रित काम करत असताना कुणीही त्यात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये, असे अजित पवार यांनी नाराजीच्या सुरात सांगितले आहे. अजित पवार यांच्या आधी नाना काँग्रेसचे नाना पटोले यांनी देखील युपीए च्या नेतृत्वावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर कठोर प्रहार करत शिवसेनेला तंबी दिली.महाविकास आघाडी काँग्रेसवर टिकून आहे,हे शिवसेनेने विसरू नये,असा प्रहार पटोले यांनी केला.
युपीएच्या नेतृत्वा वरून नाना पटोले यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली. शिवसेना हा यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे यूपीएने कुणाला पाठिंबा द्यावा हे ते ठरवू शकत नाही. त्यांनी सल्ले देऊ नयेत असं सांगतानाच संजय राऊत कोणाचे प्रवक्ते आहेत ते आधी त्यांनी जाहीर करावं, मग आम्ही त्यावर बोलू, असं पटोले म्हणाले.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही राऊत यांच्या मागणीला केराची टोपली दावली आहे. यूपीए-२ नाही तर एकच राहणार आहे. सोनिया गांधीच यूपीएचं नेतृत्व करतील. राऊतांनी काँग्रेसवर बोलण्याची गरज नाही, असं थोरात म्हणाले. तसेच काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसने अनेक चढउतार पाहिले आहेत. आज कठिण दिवस असले तरी काँग्रेसला चांगले दिवस येतील. यूपीएचं नेतृत्व सोनिया गांधीच करतील. त्यामुळे राऊत म्हणतात त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.
वाझें व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यापासून संजय राऊत सतत ठाकरे सरकार मधील मंत्र्यांवर भाष्य करत मंत्र्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देत देत आहे. सामना मध्ये लिहिलेल्या सदर मध्ये तर संजय राऊत यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला.
संजय राऊत यांनी नेमकं काय म्हणाले ?
“परमबीस सिंह हे महत्त्वाकांक्षी अधिकारी आहेत. होमगार्ड महासंचालक पदावरील बदली ते सहन करू शकले नाहीत. त्यांच्या अस्वस्थतेत तेल ओतले ते गृहमंत्री देशमुखांनी. पोलीस आयुक्तांनी चुका केल्या, त्यामुळे त्यांना जावे लागले असे एक विधान देशमुखांनी करताच परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट गृहमंत्र्यांनी कसं दिलं होतं, अशा पत्राचा स्फोट केला. पुन्हा हे टार्गेट कुणाला दिले, तर मनसुख हिरेन या तरुणाच्या हत्येचा आरोप ज्यांच्यावर आहे त्या सचिन वाझेंना. सचिन वाझे हे आता रहस्यमय प्रकरण झाले. पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका व भरवशाचा असा हा वाझे फक्त साधा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा खऱ्या चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करीत होता, तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी?,” असं राऊत यांनी म्हटलं होतं.
मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी होत असेल तर संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतला जातो. महाराष्ट्रात याच कारणांवरून यापूवी अनेक मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. युती शासनाच्या यापूर्वीच्या शासन काळात तत्कालीन मंत्री महादेव शिवणकर आणि शोभा फडणवीस यांना तर मागच्या कार्यकाळात एकनाथ खडसे यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार का? याकडे लक्ष लागले आहे. आता तर सेनेच्या मुखपत्रातूनही देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात आली आहे. हे येथे विशेष. एकंदरीत, वाझें व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप व इतर तत्सम मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही,आघाडीत केव्हाही बिघाडी होऊ शकते, अशी एकंदर राजकीय परिस्थिती आहे.




