पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता सरसकट उत्तीर्ण करणार : वर्षा गायकवाड

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे. मात्र शिक्षण विभागाने नववी ते अकरावीच्या परीक्षांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी ही घोषणा केली. ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत शिक्षणमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.
राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थ्यांचे वर्षभराचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. त्यात या विद्यार्थ्याने कशाप्रकारे अभ्यास केला हे बघितले पाहिजे. पण आताची परिस्थिती बघता हे यावर्षी ते होणं शक्य नाही. राज्यात पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
राज्यात कोरोनाची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. अशापरिस्थितीत पहिली ते आठवी वार्षिक मूल्यमापन याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन, युट्यूब, गुगल यामाध्यमातून आपण शिक्षण सुरु ठेवलं होतं. खरंतर पहिली ते चौथीच्या शाळा या वर्षभरात भरवल्या गेल्या नाहीत. तर पाचवी ते आठवी या शाळा सुरु झाल्या. पण काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या तर काही ठिकाणी शाळा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. ज्या ठिकाणी शाळा सुरू होत्या त्या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झाले नाही. पण विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावे असा प्रयत्न होता. यासह कोणत्य़ाही प्रकारचे नुकसान होऊ नये, यासाठी सातत्याने प्रयत्न देखील सुरू असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
यासोबतच, सध्या करोनाची परिस्थिती पाहता आणि वार्षिक मुल्यमापनाबाबत निर्णय घेत असताना, आम्ही शालेय शिक्षण माध्यमाद्वारे असा निर्णय घेत आहोत की, पहिली ते आठवीचे जे विद्यार्थी आहेत, आरटीईच्या अंतर्गत म्हणजे मोफत शिक्षण अधिकाराच्या कायद्यांतर्गत, खरंतर या मुलांचं वर्षभराचं मुल्यमापन बघितले पाहिजे, परंतु यंदाची परिस्थिती आपल्या सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे यंदा हे करणं शक्य नाही. म्हणून शनिवारी आम्ही शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून असा निर्णय घेत आहोत की, राज्यातील जे पहिली ते आठवी इयत्तेमधील विद्यार्थी आहेत, शिक्षण हक्क अधिकाऱाच्या अंतर्गत जे विद्यार्थी येतात, त्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करून त्यांना पुढील वर्गात पाठवण्यात येत आहे. असे देखील शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. तर कोरोना दरम्यान, डिजिटल माध्यमातून शिक्षण सुरु होते. पण आजचा निर्णय हा पहिली ते आठवीच्या विद्यार्थी जे RTE अंतर्गत त्यांना थेट पुढील इयत्तेत पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.




