स्पोर्ट्स

नवख्या खेळाडूंसह मैदानावर उतरलेल्या भारतावर श्रीलंकेची ३ गडी राखून मात

कोलंबो : मालिकेत विजयी आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियानं तिसऱ्या वन डे सामन्यात पाच पदार्पणवीरांसह सहा बदल केले, परंतु त्याचा फायदा श्रीलंकेनं उचलला. या दौऱ्यावर सर्व खेळाडूंना संधी मिळेल असा प्रयत्न केला जाईल, असे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणालाच होता. त्यामुळेच आज टीम इंडियानं पाच पदार्पणवीर मैदानावर उतरवले. आज श्रीलंकेचा संघ सर्वच आघाड्यांवर टीम इंडियावर भारी पडला. भारतीय क्षेत्ररक्षकांनी तीन झेल सोडले. अविष्का फर्नांडो व भानुका राजपक्षा यांनी वैयक्तिक अर्धशतकी खेळी केली अन् विजय पक्का केला. भारताला या मालिकेत २-१ अशा विजयावर समाधान मानावे लागले. चेतन सकारिया (२), राहुल चहर (३) आणि के गौथम (१) यांनी विकेट्स घेतल्या.

तिसऱ्या वन डे सामन्यात केलेले पाच बदल टीम इंडियाच्या पथ्यावर पडले नाही. पदार्पणवीर संजू सॅमसनने दमदार खेळ केला, परंतु अन्य फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी कमाल दाखवली. प्रवीण जयविक्रमा (३/५९) आणि अकिला धनंजया (३/४४) यांनी भारताला मोठे धक्के दिले. पृथ्वी शॉ सुसाट खेळला, संजू व सूर्यकुमार यादवनंही चांगले योगदान दिले. पृथ्वी ४९ चेंडूंत ८ चौकारांसह ४९ धावांवर पायचीत झाला. संजूला ४६ धावांवर (५ चौकार व १ षटकार) आणि सूर्यकुमारला ४० धावांवर माघारी जावं लागलं. नवदीप सैनी व राहुल चहर यांनी भारताला समाधानकारक पल्ला गाठून दिला. या दोघांनी नवव्या विकेटसाठी २९ धावा जोडल्या. भारताचा संपूर्ण संघ ४३ षटकांत २२५ धावांत तंबूत परतला.

प्रत्युत्तरात टीम इंडियाच्या नवख्या गोलंदाजांवर हात साफ करण्याचा मनसुबा श्रीलंकेच्या सलामीवीरांनी स्पष्ट केला. पण, सहाव्या षटकात के गौथमनं यजमानांना पहिला धक्का दिला. पदार्पणाच्या सामन्यात गौथमनं पहिल्या तीन चेंडूंत १० धावा दिल्या, परंतु चौथ्या चेंडूवर मिनोद भानुका यानं मारलेला स्वीप फटक्याचा चेंडू चेतन सकारीयानं सुरेखरित्या टिपला. या विकेटनंतर श्रीलंकेनं सावध पवित्रा घेतला. भानुका राजपक्षा व अविष्का फर्नांडो यांनी लंकेचा डाव सावरला अन् अर्धशतकी भागीदारी करताना १६ षटकांत धावफलकावर संघाच्या शंभर धावा झळकावल्या.

फर्नांडो आणि राजपक्षा या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावताना १०५ चेंडूंत १०९ धावांची भागीदारी केली. पदार्पणवीर चेतन सकारीयानं ही जोडी तोडली. त्यानं राजपक्षाला ६५ (१२ चौकार) धावांवर माघारी पाठवले अन् यावेळी गौथमनं झेल टिपला. पुढच्याच षटकात चेतननं आणखी एक विकेट घेताना स्वतःच्याच गोलंदाजीवर धनंजया डी सिल्व्हाचा (२) झेल टिपला. हार्दिक पांड्या व राहुल चहर यांनीही विकेट घेत सामन्यातील चुरस कायम राखली. संघाला विजयासाठी १३ धावांची गरज असताना फर्नांडोला माघारी जावं लागलं. राहुल चहरनं त्याची विकेट घेतली. फर्नांडोनं ९८ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ७६ धावा केल्या. चहरनं फिरकीची जादू दाखवताना सामन्यातील तिसरी विकेट घेत लंकेला झुंजवले. श्रीलंकेनं ३ विकेट्स राखून हा सामना जिंकला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button