ब्राह्मणांचे एन्काउंटर करणाऱ्यांना धडा शिकवा : मिश्रा

अयोध्या: आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास आतापासून सुरुवात झाली आहे. अनेक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. बसप प्रमुख मायावती यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशात जातीय समीकरण साधण्यासाठी बसप संपूर्ण राज्यात ब्राह्मण संमेलन आयोजन करत आहे. उत्तर प्रदेशात ब्राह्मणांचे एन्काउंटर करणाऱ्यांचा बदला घेण्याची वेळ आली आहे, असे खळबळजनक उद्गार बहुजन समाज पक्षाचे (बसप) सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रा यांनी काढले.
सतीशचंद्र मिश्रा यांच्या टीकेचा रोख योगी आदित्यनाथ सरकारवर होता. उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे इतर अनेक पक्षांप्रमाणे बसपही समाजातील सर्व घटकांना आपल्या जवळ आणू पाहात आहे. याच विचाराने उत्तर प्रदेशात ठिकठिकाणी ब्राह्मण संमेलन आयोजित करण्याचा आदेश बसपच्या प्रमुख मायावती यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना दिला. त्यानुसार अयोध्या येथे पहिले ब्राह्मण संमेलन आयोजित करून या उपक्रमाची सुरुवात झाली. याची जबाबदारी सतीशचंद्र मिश्रांवर होती.
उत्तर प्रदेशमध्ये बसपचे सरकार आल्यानंतरच अयोध्येत भव्य राम मंदिर बनणार आहे, असेही ते म्हणाले. कुख्यात गुंड विकास दुबे पोलिसांबरोबरच्या एन्काउंटरमध्ये मारला गेला. विकास दुबेची नातेवाईक व बिकरू हत्याकांडातील आरोपी खुशी दुबे हिची सुटका होण्याकरिता प्रयत्न करण्याचे बसपने ठरविले आहे. दुबे हे ब्राह्मण आहेत. त्या अनुषंगाने सतीशचंद्र मिश्रा यांनी खळबळजनक वक्तव्य केल्याचे सांगितले जात आहे.
बसप नेते सतीशचंद्र मिश्रा यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशात १३ टक्के ब्राह्मण व २३ टक्के दलित यांच्यात बंधुभाव निर्माण झाला, तर राज्यात बसपचे सरकार येऊ शकते. ब्राह्मणांनी उपजातींचा त्याग करून त्यांच्यातील सर्वांना समान लेखले तर त्यांची शक्ती आणखी वाढेल. भाजपने ब्राह्मणांच्या कल्याणासाठी काय केले, हा सवाल त्या पक्षाला विचारला पाहिजे. मायावती यांनी १५ ब्राह्मणांना मंत्री केले, ३५ जणांना विविध महामंडळाचे अध्यक्ष केले, १५ ब्राह्मणांना विधान परिषदेचे आमदार केले तर २२०० ब्राह्मण वकिलांना सरकारी वकील बनविले. ब्राह्मण अधिकाऱ्याला राज्याचा मुख्य सचिव केले.




