नवी दिल्ली : केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आगामी सण सावधगिरीने आणि सुरक्षितपणे साजरे करण्याची खात्री करण्यास सांगितले आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, कोविड प्रकरणांमध्ये कोणतीही वाढ होऊ नये यासाठी मानक कार्यप्रणाली पाळणे आवश्यक आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की, आतापर्यंत ७२.२४ कोटी लोकांना म्हणजेच ७६ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे. तर, ३०.०६ कोटी म्हणजेच ३२ टक्के लोकांना दुसरा डोस दिला गेला आहे.
भूषण यांनी पत्रात म्हटलं आहे की, प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात आणि ५ टक्के पेक्षा जास्त संसर्ग दर असलेल्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाऊ नये. या व्यतिरिक्त, सणांच्या वेळी खबरदारी घेण्यासाठी संबंधित राज्य सरकारांकडून आधीच पुरेशा आवश्यक सूचना जारी केल्या पाहिजेत. यासह, कोविडशी संबंधित योग्य वर्तनाचे उल्लंघन झाल्यास सरकारने दंडात्मक कारवाईसाठी पावले उचलली पाहिजेत.
विशेष म्हणजे, केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ऑनलाइन मेळावे, ऑनलाइन खरेदी करण्यास आणि अनावश्यक प्रवास टाळण्यासाठी विविध पद्धतींचा तपास करण्यास आणि त्याचा प्रचार करण्यास सांगितले. केंद्राने म्हटले आहे की, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी स्थानिक प्रकरणांच्या संख्येवर बारकाईने लक्ष ठेवणे आणि आरोग्य मंत्रालय आणि गृह मंत्रालयाने वेळोवेळी जारी केलेल्या सल्ल्यानुसार वेळेवर आणि जोमाने हस्तक्षेप करणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारने राज्य/केंद्रशासित प्रदेशांना त्या लाभार्थ्यांना प्रोत्साहित करण्यास सांगितले ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कालावधी संपूनही दुसरा डोस घेतलेला नाही.