मुंबई इंडियन्सचा राजस्थान रॉयल्सवर ७ गडी राखून विजय

नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामातील २३व्या साखळी लढतीत मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर ७ गडी राखून विजय मिळवला. मुंबईच्या विजयात सलामीवीर क्विंटन डी कॉकने शानदार अर्धशतकी खेळी केली. मुंबईच्या या विजयाने त्याचे ६ सामन्यात ३ विजयासह ६ गुण झाले असून ते गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर कायम आहेत.
मुंबई इंडियन्सनं राजस्थानला नमवून आयपीएल स्पर्धेतील तिसरा विजय नोंदवला आहे. राजस्थाननं विजयासाठी दिलेलं १७२ धावांचं लक्ष्य ३ गडी गमवून आणि ९ चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केलं. या विजयात क्विंटन डी कॉकची खेळी महत्वपूर्ण ठरली. त्याने ५० चेंडूत ७० धावा केल्या. राजस्थानचा पुढचा प्रवास मात्र खडतर होणार आहे. राजस्थाननं आतापर्यंत ६ पैकी ४ सामने गमावले आहेत. त्यामुळे आयपीएलच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना पुढचे सामने जिंकावे लागतील.
विजयासाठी १७२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईच्या डावाची सुरूवात रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ४९ धावा केल्या. चांगल्या सुरूवातीनंतर मुंबईला पहिला धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा १४ धावांवर बाद झाला. त्याला ख्रिस मॉरिसने बाद केले. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव देखील १६ धावा करून माघारी परतला. मुंबईकडून क्विंटन डी कॉक आणि कृणाल पंड्याने चांगली फलंदाजी केली. क्विंटननं नाबाद ७० धावांच्या खेळीत २ षटकार आणि ६ चौकार मारले. तर कृणाल पंड्याने ३९ धावांच्या खेळीत २ षटकार आणि २ चौकार मारले. त्यामुळे फलंदाजांवरील दडपण कमी होत गेलं. कृणाल पंड्या बाद झाल्यानंतर किरॉन पोलार्डनं मोर्चा सांभाळला आणि ८ चेंडूत १६ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मुंबईच्या गोलंदाजांनी सार्थकी लावला. मुंबईच्या गोलंदाजांना राजस्थानचे गडी बाद करण्यात तेवढं यश आलं नसलं तरी मोठी धावसंख्या मात्र रोखली. त्यामुळे मुंबईच्या फलंदाजांवरील दडपण कमी झालं. राजस्थानच्या जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली.मात्र मोठी धावसंख्या उभारण्यात कर्णधार संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांना अपयश आलं. त्यामुळे १७१ धावांपर्यंत मजल मारता आली. जोस बटलरने ३२ चेंडूत ४१ धावा केल्या. त्यात ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. यशस्वी जयस्वाल २० चेंडूत ३२ धावा करून तंबूत परतला. राहुल चाहरनं आपल्याच गोलंदाजीवर त्याच्या झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र २७ चेंडूत ४२ धावा करून तो तंबूत परतला. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर त्रिफाळाचीत झाला. तर शिवम दुबे ३५ धावा करत तंबूत परतला. जसप्रीत बुमराहने आपल्याच गोलंदाजीवर त्याचा झेल घेत बाद केलं. राहुल चाहरने ४ षटकात ३३ धावा देत २ गडी बाद केले.
मुंबईचा पुढचा सामना धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ससोबत १ मे रोजी आहे. सध्या धोनी बिग्रेड चांगल्याच फॉर्मात आहे. पहिला सामना गमावल्यानंतर धोनी ब्रिगेडनं सलग ५ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे मुंबईसमोर चेन्नईचं मोठं आव्हान असणार आहे.




