राजकारण

मनसेकडून रस्त्यावरील खड्ड्यांचा राग टोल नाक्यावर !

भिवंडी : गणेशोत्सव काळात ठाणे-भिवंडी रस्ता बनला नाही तर मनसेच्यावतीने टोल नाका फोडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. अखेर टोल कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभागाने मनसेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने सोमवारी सकाळी मनसेचे जिल्हा सचिव संजय पाटील व मनसे वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष संतोष म्हात्रे यांनी कशेळी येथील टोलनाका फोडला व टोल कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा जाहीर निषेध केला.

ठाणे भिवंडी रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असते ज्याचा त्रास सामान्य नागरिकांसह वाहन चालक व प्रवाशांना होत आहे. मात्र, रस्ता नादुरुस्त असतांनाही या महामार्गावर कशेळी येथील टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात टोल वसुली होत असते. रस्ता कोमात आणि टोल वसुली जोमात अशी परिस्थिती या रस्त्याची असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने या रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भात अनेक आंदोलने करण्यात आली होती. मात्र, टोल वसूल करणाऱ्या कल्याण संगम इन्फ्रा या कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर या आंदोलनांचा कोणताही परिणाम झालेला नाही. टोल कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे या रस्त्याची पुरता दुरावस्था झाली असून गरोदर महिलांसह वृद्धांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करतांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

काही दिवसांपूर्वीच मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष डी. के. म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली कशेळी टोल नाक्यावर मुंडन आंदोलन करण्यात आले होते. यावेळी गणेशोत्सवा आधी रस्त्यावर पडलेले खड्डे भरून रस्ता सुस्थितीत करावा असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला होता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग व टोल कंपनीने मनसेच्या मुंडन आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नसल्याने या रस्त्यावरील खड्डयांची परिस्थिती जैसे थे अशीच होती. अखेर दहा दिवसांचा गणेशोत्सव संपल्यानंतर आज सोमवारी सकाळी मनसेचे जिल्हा सचिव संजय पाटील व मनसे वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष संतोष म्हात्रे यांनी कशेळी टोल नाका फोडला. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button