नवी दिल्ली : कोरोना रूग्णांची कमी झालेली संख्या पाहता, केंद्रीय निवडणूक आयोगाने काही नियमांमध्ये शिथिलता देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार राजकीय पक्षांना दिलासा देण्यात आला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शनिवारी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. विशेषतः विधानसभा निवडणूक असणाऱ्या राज्यांमध्ये निवडणूक आयोगाने आढावा घेतला. केंद्रीय आरोग्य सचिवांनी ठिकठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर कोरोनाची परिस्थिती अनेक ठिकाणी सुधारली असल्याचे म्हटले आहे. तसेच कोरोना रूग्णांच्या संख्येतही घट झाल्याचे म्हटले आहे. कोरोनाची आकडेवारी येणारी राज्ये ही निवडणुक नसलेली राज्य असल्याचे मत आयोगाने नोंदवले आहे. देशात कोरोनाची रूग्णसंख्या असणाऱ्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका असणाऱ्या राज्यातून फारच थोड्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण आढळत असल्याचे निदर्शनास आले आहे. नव्या नियमावलीनुसार सभा आणि रॅलीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये स्थानिक पातळीवर प्राधिकरणाच्या नियमावलीचे पालन करूनच या गोष्टीसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रचाराची वेळ वाढवतानाच पद यात्रांसाठीही परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनाची देशपातळीवरील रूग्णसंख्या पाहिली तर कोरोना रूग्णसंख्या २१ जानेवारीला ३.४७ लाख इतकी होती, हीच रूग्णसंख्या आता ५० हजारांवर आली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये जिथे रूग्णसंख्या ही २२ जानेवारीला ३२ हजार इतकी होती, हीच रूग्णसंख्या १२ फेब्रुवारीपर्यंत घसरली आहे.
नवे नियम :
१) निवडणूक प्रचारासाठी रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत असणारा मज्जाव यामध्ये वेळेत सुधारणा करत रात्री १० ते सकाळी ८ या काळात कोणताही प्रचार करण्यासाठी बंधने कायम ठेवण्यात आली आहे. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत कोरोना नियमावलीचे स्थानिक पातळीवरील नियम पालन करत प्रचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
२) राजकीय पक्षांना तसेच उमेदवारांना सभा आणि रॅली घेण्यासाठी ५० टक्के क्षमतेत खुल्या मैदानातील प्रचारासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये स्थानिक प्राधिकरणाने निश्चित केलेले नियम लागू राहतील.
३) पद यात्रांसाठीही स्थानिक प्राधिकरणाने दिलेल्या परवानगीने मर्यादेसह तसेच जिल्हा पातळीवर परवानग्या घेऊनच परवानगी देण्यात येणार आहे.