अर्थ-उद्योग

कर्जबुडव्या मल्ल्याला दणका; ६२०० कोटींचे शेअर्स विकून होणार कर्जवसुली

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली देशातील बँकाचा एक गट आर्थिक फसवणूक करुन पळून गेलेल्या विजय मल्ल्या याच्या तीन कंपन्यांमधील शेअर होल्डिंग विकून किंगफिशर विमान कंपनीला दिलेले ६२०० कोटींपेक्षा अधिक कर्जाची वसुली करणार आहे. युनायटेड ब्रुवरीज लिमिटेड, यूनायटेड स्पिरिट्स लिमिटेड आणि मॅकडॉवेल होल्डिंग्स लिमिटेडमधील विजय मल्ल्याचे शेअर्स ब्लॉक डील्समध्ये २३ जून रोजी विकले जातील. विजय मल्ल्याच्या मालकीची किंगफिशर एअरलाइन्स ही कंपनी ऑक्टोबर २०१२ पासून बंद आहे.

दरम्यान, विजय मल्ल्याला जानेवारी २०१९ मध्ये कर्ज बुडवल्याप्रकरणी आणि बँकाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी देशातून पळून गेलेला गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले आहे. सध्या विजय मल्ल्या ब्रिटनमधील न्यायालयांमध्ये त्याला भारताच्या ताब्यात देण्याची जी मागणी करण्यात येत आहे. त्याविरोधात तो खटला लढत आहे. जर विजय मल्ल्याच्या मालकीच्या शेअर्सची विक्री झाली तर बँकाकडून किंगफिशर एअरवेज कर्ज प्रकरणामध्ये विजय मल्ल्याविरोधातील पहिली मोठी वसुली ठरणार आहे. किंगफिशरला देण्यात आलेले कर्ज हे २०१२ च्या शेवटी नॉन परफॉर्मिंग असेट (एनपीए) म्हणून जाहीर करण्यात आले होते. विजय मल्ल्याने मार्च २०१६ मध्ये भारतातून पळ काढला. १७ बँकांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

मनी कंट्रोलने काही कागदपत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, या शेअर्सची विक्री बंगळुरुमधील डेट रिकव्हरी ट्रायब्यूनलच्या (DRT) देखरेखीखाली होईल. ज्यांनी रिकव्हरी अधिकाऱ्याला ६२०३ कोटी रुपयांच्या कर्जवसुलीसाठी शेअर्स विक्रीची जबाबदारी दिली आहे. जर ब्लॉक डीलमध्ये या शेअर्सची विक्री झाली नाही तर बँक बल्क किंवा रिटेल माध्यमातून शेअर्सची विक्री करु शकते. किंगफिशरला कर्ज देणाऱ्या बँकांच्या यादीमध्ये एसबीआयससोबतच पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ बडोदा, इलाहाबाद बँक, फेडरल बँक आणि अ‍ॅक्सेस बँकेचा समावेश आहे.

या प्रकरणामध्ये विजय मल्ल्याने गेल्या काही दिवसांपूर्वी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, असा असा दावा केला होता की, जितके पैसे उधार घेतले आहेत त्यापेक्षा अधिक संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

किंगफिशर एअरलाइन्स कर्ज प्रकरणात विजय मल्ल्या यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआय चौकशी करीत असतानाच विजय मल्ल्याने देशातून पलायन केले होते. बँका चालू तिमाहीतच मल्ल्या यांच्या मालकीच्या समभागांची विक्री करू शकतील. आपण बँकांना तडजोडीचे कित्येक प्रस्ताव दिले असल्याचा दावा विजय मल्ल्याने यापूर्वी केला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, विजय मल्ल्या निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्यास मालमत्ता पुन्हा त्यांच्या ताब्यात द्याव्यात. त्याआधी बंगळुरूच्या कर्जवसुली प्राधिकरणाने बँकांना विजय मल्ल्या याच्या मालमत्ता विकण्याची परवानगी दिली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button