
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन मोदींनी केलं. राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला यश आलं. त्यामुळे, हा शेतकऱ्यांचा विजय असल्याची भावना देशभरातून व्यक्त होत आहे. मात्र, मोदींच्या घोषणेनंतरही हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे किसान एकता आंदोलनाचे प्रमुख राकेश टीकैत यांनी म्हटलं आहे.
दिल्लीतील सीमारेषेवर आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी जल्लोष केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी एकमेकांना जिलबी वाटून आपला आनंद व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या विजयाचं देशभरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. मात्र, तात्काळ आंदोलन वापस घेत नसल्याचं किसान एकता आंदोलनाचे प्रमुख राकेश टीकैत यांनी म्हटलं आहे.
एमएसपी पर गारंटी कानून बनने तक जारी रहेगा आन्दोलन ;- @RakeshTikaitBKU pic.twitter.com/JQOCoOLe44
— Rakesh Tikait (@RakeshTikaitBKU) November 19, 2021
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या राकेश टीकैत यांनी ट्विट करुन आंदोलनाची पुढील दिशा सांगितली. तसेच, हे आंदोलन आजच समाप्त करण्यात येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राकेश टिकैत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, आंदोलन तात्काळ वापस घेतलं जाणार नाही. ज्या दिवशी संसदेत कृषी कायदे रद्द केले जातील, त्या दिवसापर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत, असे टीकैत यांनी म्हटले. तसेच सरकार एमएसपीसह शेतकऱ्यांच्या अन्य मुद्द्यांवर देखील चर्चा करेल, असेही ते म्हणाले.
देशात आज गुरुनानकांचं पवित्र प्रकाश पर्व आहे. ही वेळ कुणालाही दोष द्यायची नाही. आज मी पूर्ण देशाला हे सांगायला आलो आहे की, आम्ही तीन कृषी कायद्यांना मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिनाअखेरीस सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू. आंदोलक शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आज पवित्र दिवस आहे. शेतकऱ्यांनो आपापल्या घरी परत जा, शेतात जा, परिवाराकडे जा. नवी सुरुवात करू या, असे भावनिक आवाहनही मोदींनी आंदोलक शेतकऱ्यांना केले आहे.




