जळगावात नणंद-भावजय यांच्यात कलगीतुरा !

जळगाव : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पूर्वाश्रमीचे भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलीय. ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? असा सवाल रोहिणी खडसे यांनी विचारला आहे. त्याला आता एकनाथ खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांनी उत्तर दिलंय. ओबीसी समाजाने विचार केला नसता तर विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसेंना संधी मिळाली नसती, असा टोला रक्षा खडसे यांनी रोहिणी खडसेंना लगावलाय.
एकीकडे ओबीसी आरक्षणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकाटिप्पणी सुरु असताना दुसरीकडे आता याच मुद्द्यावरुन नणंद-भावजय आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. खडसे यांच्या कन्या आणि खडसे यांच्या सुनबाई यांच्यातच आरोप-प्रत्यारोप सुरु झालाय. रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा आहेत. तर रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. त्यामुळे आता ओबीसी आरक्षणावरुन नणंद-भावजय एकमेकांसमोर आल्या आहेत. रोहिणी खडसे यांनी ओबीसी नेतृत्व संपवणाऱ्या भाजपला आताच ओबीसींची कळवळा कसा आला? असा सवाल केलाय. त्यावर भाजपने ओबीसी समाजाचा विचार केला नसता तर आमच्यासारख्या ओबीसींना संधी मिळाली नसती. रक्षा खडसे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळालं नसतं, असं उत्तर रक्षा खडसे यांनी दिलंय.
रोहिणी खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिल्यांदाच थेट हल्ला केलाय. त्यांनी ट्विट करत फडणवीसांना रोकडा सवाल केलाय. भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता…? आता गळा काढण्यात अर्थ नाही, असं त्यांनी म्हटलंय. एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी पावलोपावली त्रास दिला, क्षणाक्षणाला छळलं, प्रसंगी पक्षातून बाहेर जाण्यासंबंधीचं पाऊल उचलावं लागलं, अशी थेट टीका स्वत: एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडताना केली होती. ओबीसी नेतृत्व डळमळीत करण्याचं कामही फडणवीसांनी अनेकदा केल्याचं खडसेंनी म्हटलं. याचाच संदर्भ रोहिणी खडसे यांच्या या ट्विटला आहे.




