राजकारण

पाचही राज्यांत काँग्रेसला अपयश; पक्षांतर्गत विरोधकांना बळ

नवी दिल्ली: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. त्यातही आसाम, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये काँग्रेसचा सफाया झाला आहे. आधीच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत कुरबुरी सुरू असतानाच आता पक्षाचा या पाचही राज्यात झालेल्या पराभवामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासमोरील अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एका अर्थाने या पराभवामुळे पक्षातील बंडखोरांना राहुल गांधींना घेरण्यासाठी आणखी एक संधी मिळाली आहे, असं मत राजकीय निरीक्षकांनी नोंदवलं आहे.

देशातील पाचही राज्यातील निवडणूक रणनीती काँग्रेस नेते आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी ठरवली होती. राहुल गांधी हे केरळच्या वायनाडचे खासदार आहेत. त्यामुळे केरळमध्ये पक्षाची चांगली कामगिरी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. राहुल गांधी यांनीही केरळवर सर्वाधिक फोकस केला होता. तर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आसामवर सर्व लक्ष केंद्रीत केलं होतं. पाच राज्यातील निवडणुका असताना या दोन्ही नेत्यांनी केवळ या दोनच राज्यांवर लक्ष केंद्रीत केलं होतं. तरीही काँग्रेसचे हे दोन्ही नेते या दोन्ही राज्यांमध्ये यशस्वी झाले नाहीत. सत्ता विरोधी वातावरण असतानाही या मतदारांना आपल्याकडे वळवण्यात काँग्रेसचं नेतृत्व यशस्वी झालं नाही.

आसाम विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेस अपयशी ठरली आहे. तर भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. बदरुद्दीन अजमल यांच्या पक्षासोबत काँग्रेसने आघाडी केली होती. मात्र, त्याचाही काही फरक पडला नाही. एवढेच नव्हे तर प्रियांका यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडे आसामच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती. त्यांचा हा प्रयोगही अपयशी ठरला.

दुसरीकडे राहुल गांधी यांनी स्वत:ला केवळ केरळ पुरतेच मर्यादीत ठेवले. काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफसाठी राहुल गांधी सकारात्मक वातावरण निर्माण करतील असं वाटत होतं. राहुल यांनी प्रचाराचं तंत्र बदलून लोकांमध्ये मिसळून त्यांनी संवाद साधायलाही सुरुवात केली होती. तरीही मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचं वर्चस्व मोडीत काढण्यात राहुल गांधींना यश आलं नाही. केरळच्या चार दशकातील इतिहासात पहिल्यांदाच सत्तेतील पक्षाला मतदारांनी दुसऱ्यांदा सत्तेचा कौल दिला आहे. सरकारविरोधी वातावरण असतानाही आसाम आणि केरळमध्ये काँग्रेसला त्याचा फायदा उचलता आला नसल्याचं या निवडणुकीतून अधोरेखित झालं आहे.

पाच राज्यातील पराभवामुळे गांधी कुटुंबाच्या विरोधात पक्षातील नाराज नेते पुन्हा एकदा दंड थोपाटण्याची शक्यता आहे. बंगालमध्ये काँग्रेसचं खातंही उघडलेलं नाही. आसाम-केरळमध्ये मोठा पराभव झाला आणि पाँडेचेरीत सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं. त्यामुळे काँग्रेसमधील असंतुष्ट नेते (जी-23) काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता आहे.

पाचही राज्यातील पराभवामुळे पक्षातील बंडखोरांकडून थेट गांधी घराण्याला सवाल केले जाण्याची शक्यता आहे. या पाचही राज्यातील निवडणुकीत केवळ काँग्रेसचा पराभव झालेला नाही, तर त्यांच्या मतांचा टक्काही कमी झाला आहे. त्यामुळे या बंडखोरांकडून पक्षाच्या पतनावर बोट ठेवलं जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय या पराभवामुळे काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल गांधी यांना उभं राहणंही कठिण होण्याची शक्यता असल्याचं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button