Top Newsराजकारण

चंद्रकांत पाटलांची नवी तारीख ! ७ मार्चला उत्तर प्रदेशात मतदान झाल्यानंतर महाराष्ट्रात भूकंप !

कोल्हापूर : राज्यातलं महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप दर महिन्याला सरकार पडण्याची तारीख देत आहे. गेल्या अडीच वर्षात जरी त्यांना हा मुहूर्त सापडला नाही. मात्र आता चंद्रकांत पाटलांनी पुन्हा सूचक विधान करत. राजकीय भूकंप होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. काही जात्यात गेले तर काही सुपात आहेत. कोठड्या तयार आहेत. उत्तर प्रदेशात ७ मार्च रोजी शेवटचे मतदान झाले की, बहुधा कारवाई सुरू होईल. असे म्हणत त्यातून पळता भुई थोडी होईल व त्यातून हे सरकार पडेल, असे आपले विश्लेषण आहे. असा अंदाज सामान्य माणूसही बांधू शकतो. असे विधान आता पुन्हा चंद्रकांत पाटलांनी केले आहे. चंद्रकांत पाटलांच्या अशा विधानामुळे चंद्रकांत पाटील जोतिष कधीपासून झाले असा सवालही महाविकास आघाडीतील नेत्यांकडून विचारण्यात येतो. त्यामुळे या चर्चा कधी थांबत नाहीत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना नेते व मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेबाबत प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, २०१४ साली भारतीय जनता पार्टीने सरकार स्थापन केले. आम्ही हे सरकार आमच्या बळावर पाच वर्षे चालविले असते. पण शिवसेनेला सत्तेबाहेर राहणे अशक्य झाले काहीही करून सत्तेत घ्यावे यासाठी ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत होते, हे आदित्य ठाकरे यांनी विसरू नये. असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकारने राजकारणासाठी सत्तेचा व पोलिसांचा दुरुपयोग चालविला आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांना पकडून पोलीस ठाण्यात नेणे आणि दबाव आणण्याचा प्रकार चालू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची १९७१ ची जमिनीची केस काढून पोलिसांनी त्यांचा प्रचंड छळ केला. अखेरीस त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. पोलिसांचा राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांप्रमाणे वापर करण्याचा हा प्रकार आम्ही सहन करणार नाही. आम्ही याच्याविरोधात लढा देऊ. जनताही अशा लोकांना धडा शिकवेल. अशा इशाराही त्यांनी दिला आहे.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे. उसाचे एफआरपीचे पैसे दोन तुकड्यात देण्याचा या सरकारचा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करणारा आहे. यामुळे शेतकरी ऊसशेती सोडून देतील असा धोका आहे. भारतीय जनता पार्टी या निर्णयाविरोधात टोकाचा संघर्ष करेल. एसटीच्या संपाविषयी ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांना विविध शहरांमध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेल्या एसटीच्या स्थानक व डेपोच्या जागा बळकावायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी संप चिघळवला आहे. सत्ताधारी आघाडीच्या सापळ्यात एसटी कर्मचारी अडकले आहेत. असा आरोप त्यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button