
नवी दिल्ली : कोकणात विविध भागात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. चिपळूण शहरात सर्वाधिक हाहा:कार पाहायला मिळत आहे. बाजारपेठ, अनेक घरं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. अशावेळी नागरिकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्र सरकार हेलिकॉप्टरसह सर्व मदत करेल असं आश्वासन दिलं आहे. त्याचबरोबर राणे यांनी राज्य सरकार पूरस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचं म्हटलंय. राज्याला ड्रायव्हर नको तर लोकांचं हित पाहणारा चांगला मुख्यमंत्री हवा आहे, अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
गाडी चालवत पंढरपूरला गेले, पण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या लोकांकडे, त्यांच्या कुटुंबियांकडे पाहण्यासाठी त्यांना वेळ नाही. राज्याला ड्रायव्हर नको आहे. राज्य सरकारकडे असे अनेक ड्रायव्हर आहेत. राज्याला चांगला, लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवा आहे. मंत्रालयात जायचं नाही, कॅबिनेटला जायचं नाही आणि गाडी चालवत पंढरपूरला जायचं यात काय भूषण आहे, असा खोचक टोलाही राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
जवळपास ३५० मिमी पाऊस झाल्याचा अंदाज आहे. हेलिकॉप्टर, बोटीने लोकांना काढणं, अन्न पुरवठा करणं, त्यांना सुरक्षितस्थळी नेणं हे काम सरकारनं केलं पाहिजे. मी केंद्रीय मंत्री नित्यानंतर रॉय यांच्याशी बोललो आहे. त्यांनी आश्वासन दिलं आहे की मी सगळी व्यवस्था करतो. गरज भासल्यास आपण अमित शाह यांच्याशीही बोलणार असल्याचं राणे म्हणाले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याची माहिती राणे यांनी दिलीय.
अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं राज्य सरकारकडून सांगितलं जात आहे. मात्र ३०० मिमी पाऊस हा ४८ तासातील आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस अचाकन पडू शकत नाही. राज्य सरकारला कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नाही. कोकणात लोकांचा जीव धोक्यात येतो आणि साधी बोटींची तरतूदही करता येत नाही का? असा सवाल राणेंनी केलाय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गांभीर्य आहे का? असा प्रश्न पडतो, असंही राणे म्हणाले.




