
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मुंबईच्या किल्ला कोर्टाने फरार घोषित केल्यानंतर आता कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांच्या जुहू येथील घरासमोर कोर्टाचा आदेश लावण्यात आला आहे. तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ३० दिवसांच्या आत परमबीर सिंग कोर्टासमोर हजर राहिले नाही तर, त्यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबईच्या किल्ला कोर्टाने बुधवारी म्हणजेच १७ नोव्हेंबर रोजी परमबीर सिंग यांना फरार म्हणून घोषित केलं. त्यांना मुंबई पोलिसांनी गोरेगावातील वसुली प्रकरणात अनेक वेळा समन्स पाठवले होते. मात्र या समन्सनंतर ते हजर झाले नाहीत. शेवटी त्यांना न्यायालयाने फरार म्हणून घोषित केलंय. आता न्यायालयाने फरार घोषित केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आलीय. परमबीर यांच्या जुहू येथील घरासमोर कोर्टाचा आदेश लावण्यात आलाय. त्यामध्ये सिंग फरार असल्याचं नमूद करण्यात आलंय. तसेच ३० दिवसांच्या आत कोर्टासमोर हजर न झाल्यास संपत्ती जप्त तसेच इतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
Mumbai: A court order, declaring former Mumbai Police Commissioner Param Bir Singh as 'absconding', pasted outside his flat located in Juhu. pic.twitter.com/zueYJu8f99
— ANI (@ANI) November 23, 2021
सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना सोमवारी अटकेपासून संरक्षण दिले आहे. तर दुसरीकडे सिंग यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा त्यांच्या विकालने केला आहे. परमबीर सिंग देशातच आहेत. ते कुठेही गेलेली नाहीत. ते पळूनही जाणार नाहीत. मात्र त्यांच्या जीवाला धोका आहे, असं वकिलाने सांगितलंय. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप केल्यामुळेच माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत, असा दावा सिंग यांनी केला आहे.
परमबीर सिंग यांच्याविरोधात एका अधिकाऱ्याने तक्रार केली होती. खोट्या एफआयआरच्या माध्यमातून माझी प्रचंड छळवणूक केली असा आरोप करत पोलिस अधिकाऱ्यानेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. या प्रकरणात सिंग यांना अटकेसारख्या कठोर कारवाईपासून असलेला दिलासा २१ ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवण्यात आला होता.‘परमबीर सिंग हे ठाण्याते पोलिस आयुक्त असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बिल्डरांच्या एका भ्रष्टाचार प्रकरणातील अनेक आरोपींची नावे वगळण्याच्या त्यांच्या दबावाला मी बळी पडलो नाही. म्हणून माझ्याच विरोधात अनेक खोटे एफआयआर दाखल करायला लावून त्यांनी माझी प्रचंड छळवणूक केली. शिवाय अंतिमत: न्यायालयाच्या निकालाने माझी निर्दोष मुक्तता झालेल्या एका प्रकरणात मला नाहक १४ महिने तुरुंगवास भोगावा लागला’ असा आरोप करत पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी सिंह यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.




