चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का? अजित पवारांनी पुन्हा डिवचलं
मंगळवेढ्याला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप फक्त फडणवीसांचेच : जयंत पाटील

पंढरपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना डिवचलंय. चंद्रकांत पाटील यांनी कधी शेती केली आहे का? भाजप ग्रामीण भागातील प्रश्न सोडवू शकत नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावलाय. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज पुन्हा एकदा पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना विजयी करण्याचं आवाहन पंढरपुरातील मतदारांना केलंय.
दरम्यान, मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पैसे आणून योजना पूर्ण करु’, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत, ‘अरे बाबा पैसे कोणी मागितले तुमच्याकडे. पैसे आम्ही मागितलेत का? महाराष्ट्र सरकारची ताकद आहे, या योजना पूर्ण करण्याची तुम्ही चिंता करु नका. जर मंगळवेढ्यासाठी एवढेच प्रेम आणि पुळका होता तर देवेंद्र फडणवीस पाच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी अनेक ठिकाणी निर्णय घेऊ शकले तर मंगळवेढ्यात का घेऊ शकले नाहीत. पाच वर्षात ही योजना पूर्ण करायला हवी होती. त्यामुळे मंगळवेढ्यात राहणाऱ्या रहिवाशांना पाणी मिळत नसेल तर त्याचे पाप फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांचे आहे, असा घणाघात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला.
पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांच्या प्रचाराच्यावेळी अजित पवार, जयंत पाटील यांच्या सभा झाल्या. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेतून पक्ष वाटचाल करत आहे. शेतकरी जगला तरच राज्य जगेल. विरोधी पक्षाचे नेते येतात आणि टीका करतात. पण तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही काय दिलं? असा सवाल अजितदादांनी केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की चांद्यापासून बांद्यापर्यंत विकास करु, पण कोरोनाचं संकट आलं. खरं तर ही निवडणूक व्हायला नको होती. पण भाजपने आडमुठेपणाची भूमिका घेत निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही, असंही अजितदादा म्हणाले.
कोरोनाच्या लाटेत सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्याचं झालं. अनेक नेते सोडून गेले. आता तुम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून द्या, डबल निधी देतो, असं आश्वासनही अजित पवारांनी आपल्या भाषणात दिलंय. राज्यातील साखर कारखान्यांचे प्रश्न महाविकास आघाडीच सोडवू शकते. पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील कारखाने मी स्वत: संचालक म्हणून निवडून देणार, असा दावाही अजितदादांनी यावेळी केलाय. आजची ही सभा सांगता सभा नाही तर विजयाची सभा असल्याचं सांगत भगीरथ भालके यांचा विजय निश्चित असल्याचा दावाही अजित पवार यांनी यावेळी केलाय.
चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर पलटवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरच्या एका सभेत चंद्रकांत पाटील यांचा पुन्हा एकदा ‘चंपा’ असा उल्लेख केला. त्यावरुन चंद्रकांत पाटील यांनीही अजितदादांवर पलटवार केलाय. जित पवार यांनी मला ‘चंपा’ बोलणं थांबवावं, अन्यथा मी तुमच्या मुलांपासून सर्वांचे शॉटफॉर्म करेन, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. अजित पवारांना मला एक इशारा द्यायचा आहे. खूप दिवस मला ‘चंपा’ म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असं सांगितलं होतं. आता हे थांबलं नाही तर त्यांचेसुद्धा जे शॉर्ट फॉर्म आहेत, त्यांच्या मुलापासून सर्वांचे शॉर्ट फॉर्म मला करावे लागतील, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.
अन् मंगळवेढ्यातील पाप फक्त फडणवीस यांचेच : जयंत पाटील
भारतीय जनता पक्षाने मंगळवेढ्यातील गावकऱ्यांच पाणी घालवण्याचे काम केले. पाच वर्ष केवळ काँग्रेसचे उमेदवार आहेत. काँग्रेस आमदार आहेत आणि ते आपल्याला दाद देत नाहीत. आपल्याकडे येऊन मुजरा करत नाहीत. त्यामुळे भाजपने मंगळवेढेकरांना पाण्यापासून वंचित ठेवले. त्यामुळे आज आम्ही तुमच्या समोर भगीरथ भालकेच्या रुपाने एक तरुण मुलगा उभा केला आहे. त्यांच्या वडीलांनी मंगळवेढे या मतदारसंघासाठी अनेक खस्ता खाल्ल्या आहेत. सर्व जाती-धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याच काम केले आहे. सामान्य माणसाची त्यांची नाळ जोडलेली होती. म्हणून आता सर्वांची जबाबदारी आहे की, ही व्यवस्था. हीच परंपरा पुढे चालवत असताना भगीरथ यांना पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवल तर आपल्या विकास कामांचा वेग तसाच राहील.




