वाढदिवशीच आमिर खानचा ‘सोशल’ संन्यास!

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. 56 व्या वाढदविसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. या सर्व चाहत्यांचे आमिर खाननं आभार मानले आहेत. परंतु लक्षवेधी बाब म्हणजे आभार मानताच त्यानं एक धक्का देखील आपल्या चाहत्यांना दिला आहे. आमिरनं सोशल मीडिया अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
“नमस्कार मित्र-मंडळींनो तुम्ही वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा मला दिल्या. याबद्दल तुमचे मनापासून आभार. आज मी एक महत्वाची घोषणा करतोय. मी सोशल मीडियाचा वापर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया सोडलं असलं तरी आपला संवाद थांबणार नाही. पूर्वीसारखेच आपण भेटत राहू. धन्यवाद” अशा आशयाचं ट्विट आमिर खाननं केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
आमिर खाननं मोबाईलपासून दूर राहायचं ठरवलं आहे. लाल सिंह चड्ढा (Lal Singh Chaddha)’ रिलीज होईपर्यंत मोबाइल वापरणार नाही असं आमिरनं सांगितलं आहे. अभिनेत्याच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार आमिर खाननं लाल सिंह चड्ढाच्या शूटिंगमध्ये काही कालावधीसाठी ब्रेक घेतला होता आता पुन्हा त्यानं या फिल्मचं शूटिंग सुरू केलं आहे. या वर्षात ख्रिसमसला ही फिल्म रिलीज होणार आहे.आमिरला आपल्याला मोबाईल फोनचं व्यसन जडल्यासारखं वाटतं आहे. कामात आणि वैयक्तिक आयुष्यातही मोबाईल फोन अडचणीचा ठरतो आहे, त्याचे दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे लाल सिंह चड्ढा रिलीज होईपर्यंत आमिर मोबाईल बंद ठेवणार नाही. जे काही महत्त्वाचे फोन असतील ते त्याच्या मॅनेजरमार्फत त्याला समजतील. त्याचं सोशल मीडियादेखील त्याची टीमच हाताळणार आहे.
आमिर खान आपल्या सिनेमांबाबत कोणतीही तडजोड करत नाही. तो पुर्ण मेहनत घेऊन त्याला परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करतो. याच कारणामुळे प्रत्येकवेळी प्रेक्षकांची मनं जिंकण्यात तो यशस्वी ठरतो. आमिरनं ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आज अभिनेत्यानं शेकडो सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. कयामत से कयामत तकपासून ‘लाल सिंह चड्ढा’पर्य़ंतचा प्रवास करणाऱ्या आमिरच्या आयुष्यातील अनेक गोष्टी आजही चाहत्यांना माहिती नाहीत.