महाराष्ट्रात विलगीकरणासाठी रेल्वेचे १७६ कोच उपलब्ध

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात ६३ हजार २९४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात रविवारी ३४९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कोरोना रूग्णांवर उपचारासाठी इंजेक्शनच्या अपुऱ्या साठ्यासह खाटांची देखील कमतरता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांच्या मदतीला रेल्वे धावून आल्याचे समोर आले आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णांना खाटांची कमतरता भासू नये यासाठी रेल्वेच्या आयसोलेशन कोचचा वापर करता येईल. देशात साडेपाचशेहून अधिक, तर राज्यात १७६ आयसोलेशन कोच उपलब्ध असल्याचेही रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
गेल्या वर्षी कोरोनाच्या फैलावादरम्यान, कोरोना रूग्णांना खाटांची कमतरता भासण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी कोरोना रूग्णांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे डब्यांचे रूपांतर आयसोलेशन कोचमध्ये करण्यात आले होते. तसेच यंदा देखील मध्य रेल्वे विभागाने ४८२ आणि पश्चिम रेल्वे विभागाने ३८६ आयसोलेशन कोच तयार केले आहेत. प्रत्येक डब्यात शेवटच्या पार्टिशनमधून दरवाजा, प्रत्येक डब्याच्या शेवटी एक इंडियन स्टाइल टॉयलेटचे रूपांतर बाथरूममध्ये करण्याची व्यवस्था तयार केली आहे.
एका डब्यात २४ खाटा
मुंबई विभागात १२८ आयसोलेशन कक्ष तयार आहेत. एका डब्यात २४ खाटा तयार करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेकडे मुंबई विभागात १२८ आयसोलेशन कोच आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर, नागपूर विभागात ४८ आयसोलेशन कोच तयार केले असल्याची माहिती मिळतेय.




