तुमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही, हे धक्कादायक !
परमबीर सिंगांना सुप्रीम कोर्टाने फटकारले

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असा दावा करून खळबळ उडवून देणाऱ्या परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्या विरोधातील सर्व चौकशा महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र संस्थेकडे सोपवाव्यात, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून, परमबीर सिंग यांना खडेबोल सुनावले आहेत.
माजी पोलीस आयुक्त असलेल्या परमबीर सिंग यांनी आपल्याविरोधात करण्यात येणारी चौकशी हा सुडाचा भाग असल्याचे म्हणत यासाठी महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र संस्थेकडे सोपवाव्यात, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. व्ही.रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. मात्र, परमबीर सिंगांची याचिका फेटाळत मुंबई उच्च न्यायालयात दाद मागू शकता, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
तुम्ही ३० वर्षे महाराष्ट्र पोलिसांत काम करत आहात. मात्र, तुम्हाला महाराष्ट्रातील पोलिसांच्या चौकशीवर विश्वास नाही, तुम्हाला तुमच्या राज्याच्या कारभारावर विश्वास नाही? हा धक्कादायक आरोप आहे. सगळ्याच गुन्ह्याविषयी आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. आम्ही तुमची याचिका फेटाळत आहोत. तुम्ही मुंबई उच्च न्यायालयात जाऊ शकता, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंगांची कानउघडणी केली आहे.
दरम्यान, परमबीर सिंग यांच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यामुळे महाराष्ट्र सरकारला दिलासा मिळाल्याचे म्हटले जात आहे. १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंगांची उचलबांगणी करण्यात आली होती. परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार व गैरवर्तनाचा आरोप केला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सिंग यांनी देशमुखांविरोधात केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते.




