जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट; पहिल्या डावात भारत सर्व बाद २१७ धावा

लंडन : जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने फलंदाजीची सुरुवात चांगली केली. गिल आणि शर्माने चांगली सुरुवात (६२ धावांची भागीदारी) केली खरी मात्र शर्मा बाद झाल्यानंतर गिल आणि नंतर पुजारा दोघेही बाद लवकर बाद झाले. ज्यामुळे दुसऱ्या दिवसाखेरीस भारताची धावसंख्या ३ बाद १४६ होती. त्यानंतर तिसऱ्या दिवशीच्या सुरुवातीपासून एक-एक विकेट जाण्यास सुरुवात झाली. आधी विराट, मग पंत बाद झाला. दरम्यान अजिंक्य संयमी खेळी करत असताना न्यूझीूलंडच्या जाळ्यात अडकला आणि भारताची सहावी विकेट पडली. ज्यानंतर काही वेळात आश्विन ही बाद झाला. सामन्याची संपूर्ण मदार जाडेजावर असताना बुमराह आणि इशांत हे जेमिसनच्या ओव्हरमध्ये लागोपाठ बाद झाले. नंतर ९२ व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर जाडेजाही बाद झाला आणि भारताचा डाव २१७ धावांवर आटोपला.
न्यूझीलंडकडून काईल जेमिसन याने सर्वोत्कृष्ट बोलिंग करत २२ ओव्हरमध्ये केवळ ३१ धावा देत ५ गडी मिळवले. त्याशिवाय नील वॅगनर आणि ट्रेन्ट बोल्टने प्रत्येकी २ आणि टीम साऊदीने एक गडी मिळवला.
विराट-रहाणे जोडीने सावरली भारताची नौका
भारतीय संघ बॅकफुटवर ढकलला गेला होता. अशावेळी कर्णधार विराट कोहलीने संयमी खेळ करत डाव सावरला. तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य रहाणेने ही उत्तम साथ दिली. ६७ व्या ओव्हरमध्ये जेमिसनने ४४ धावांवर खेळणाऱ्या विराटला बाद केलं आणि संघाला उतरती कळा लागली. त्यानंतर पंतही लगेचच बाद झाला. त्यावेळी रहाणे संघाची नौका पार करेल असे वाटत असतानाच ४९ धावांवर वॅगेनर याने रहाणेला बाद करत भारताला आणखी एक झटका दिला. ज्यानंतर कोणत्याही खेळाडूला खास कामगिरी करता आली नाही आणि भारताचा पहिला डाव २१७ धावांवर संपला. मात्र इतक्या धावा करण्यातही रहाणे आणि कोहली यांचाच सिंहाचा वाटा आहे.
काईल जेमिसन ठरला घातक
भारताकडे असणारी तगडी बॅटिंग लाईन पाहता हा स्कोर बराच कमी आहे. पण यामागील कारण आहे न्यूझीलंडचा ६ फूट ८ इंचाचा बोलर काईल जॅमिसन. जॅमिसनने कर्णधार विराटसह ऋषभ पंत आणि सुरुवातीला हिटमॅन रोहित शर्माची विकेट घेतली. सोबतच बुमराह आणि इशांत यांना एकात ओव्हरमध्ये बादही केलं. जेमिसनने एकाच डावात भारताचे ५ गडी बाद केले.
न्यूझीलंडच्या पहिल्या डावाला सुरुवात झाल्यापासून भारताच्या जलदगती गोलंदाजांनी टिच्चून मारा केला आहे. इशांत-शमी आणि बुमराहने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना जखडून ठेवलं आहे खरं, परंतु १५ षटकांच्या खेळानंतरही भारताला यश मिळाले नाही. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा न्यूझीलंडने १५ षटकात केवळ २२ धावा जमवल्या आहेत.