राज्यसभेत नेमके काय घडले; आरोपांच्या फैरीनंतर मार्शलचा लेखी खुलासा

नवी दिल्ली : राज्यसभेत गेले दोन दिवस झालेल्या धक्काबुक्की आणि गोंधळाचे आरोप-प्रत्यारोप काही थांबत नाहीत. पुरुष मार्शलनी महिला खासदारांना धक्काबुक्की केल्याचे आणि जखमी केल्याचे आरोप विरोधकांनी केले आहेत. यावर आता तेव्हा नेमके काय घडले, याचा घटनाक्रम महिला सुरक्षा सहाय्यक असलेल्या अक्षिता भट यांनी सांगितला आहे.
जेव्हा विधेयकावरून विरोध प्रदर्शन केले जात होते तेव्हा काही पुरुष खासदार माझ्या दिशेने धावले आणि सुरक्षा कडे तोडण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी याला विरोध केला तेव्हा खासदार छाया वर्मा आणि फुलो देवी नेताम यांनी माझ्यादिशेने कूच केली. माझ्या खांद्याला धरून बाजुला ढकलले आणि पुरुष खासदारांना कडे तोडून टेबलपर्यंत पोहोचण्यासाठी वाट मोकळी करून दिली, असे अक्षिता भट (जीआर- II) यांनी स्पष्ट केले.
या दोन्ही महिला खासदारांनी मला शारीरीक दृष्ट्या आणि बळजबरीने ढकलले. त्यांनी माझे खांदे पकडे आणि ओढले. यामागे त्यांचा उद्देश त्यांच्या खासदारांना सुरक्षा कडे भेदून देण्याचा होता, असा आरोपही अक्षिता भट यांनी केला आहे. याचवेळी इलामारन करीम यांनी मला सुरक्षा कड्यापासून बाहेर ढकलण्यासाठी माझी मान पकडली. काही काळासाठी मला माझा श्वास कोंडल्यासारखे झाले, असे दुसरे सुरक्षा सहा्यक राकेश नेगी (जीआर- I) यांनी सांगितले.
काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी आरोप केला होता की, राज्यसभेत जेवढे सदस्य नव्हते त्यापेक्षा जास्त संख्येने मार्शल हजर होते. पुरुष मार्शलांन महिला खासदारांनाही धक्काबुक्की केली. हे मार्शल संसदेतील नव्हते तर बाहेरील होते. यावर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांची काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विरोधकांनी भेट घेतली होती. १० ऑगस्टपासूनच राज्यसभेत अधिक संख्येने सुरक्ष रक्षक तैनात केले होते, जे सामान्य कामकाजाच्या दिवशी कधीही तिथे नव्हते.



