आमचे दौरे गरजेचे, आम्ही गेलो तर शासकीय यंत्रणा जागी होते : फडणवीस

मुंबई : शरद पवारांनी जे काही आवाहन केलंय, त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. दौरे करणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या दौऱ्याचा ताण हा शासकीय यंत्रणेवर येऊ नये. मी तर विरोधी पक्षनेता आहे. आम्ही जातो तेव्हा शासकीय यंत्रणा फारशी तिथ नसतेच. सरकारनं तसा जीआरच काढलेला आहे,’ असं विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
नैसर्गिक संकट येतं तेव्हा मदतकार्य करणं गरजेचं असतं. पण, अशा प्रकारचे दौरे केल्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा त्यांच्यासाठी फिरवावी लागते, ते योग्य नाही. ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आमचे दौरे गरजेचे आहेत. आम्ही गेलो तर शासकीय यंत्रणा जागी होते. आम्ही गेल्यामुळे कुठेतरी शासकीय यंत्रणा कामाला लागते. महत्वाचं म्हणजे लोकांचा जो आक्रोश आहे तो आम्हाला समजून घेता येतो आणि तो सरकारसमोर मांडता येतो. त्यामुळे पवार साहेबांच्या आवाहनाचा एवढाच अर्थ घेतला पाहिजे की, रेस्क्यू ऑपरेशन किंवा मदतकार्य आपल्यामुळे थांबता कामा नये. त्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. बाकी विरोधी पक्षनेता म्हणून जो दौरा करण्याची आवश्यकता आहे, ते मी करणारचं, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.