छत्तीसगडमधील जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : अमित शाह
नक्षलवादविरोधी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा

रायपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडमधील बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या भ्याड नक्षलवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत म्हटले की, मी आश्वासन देतो की, नक्षवाद्यांविरोधातील संघर्ष अधिक तीव्र करत या संघर्षात निश्चितपणे आपला विजय होणार आहे. जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियांना सांगू इच्छितो की, आपल्या जवानांचे बलिदान हा देश कधीच विसरणार नाही. या संकटाच्या काळात संपूर्ण देश जवानांच्या पाठीशी उभा आहे.
छत्तीसगडमधील बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात २४ जवानांना वीरमरण आले. ७०० नक्षलवाद्यांच्या जमावाने जवांनावर बेझूट गोळीबार केला. या भ्याड नक्षलवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्तीसगडमध्ये दाखल झाले असून त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहत त्यांनी म्हटले की, या घटनेनंतर मी अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेतली. यावेळी जवानांचे मनोबल उंचवण्याचा प्रयत्न केला. मी विश्वास देतो की, नक्षलवाद्याविरोधातील लढाई आता थांबणार नसून अधिक तीव्र होणार आहे. या भ्याड हल्लावर जोरदार प्रतिउत्तर दिले जाईल. नक्षलवाद्याविरोधातील लढाईत विजय नक्कीच आहे. दरम्यान गेली ५ ते ६ वर्षे छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांचे कॅम्प उद्धस्त करण्यात यश मिळत आहे. त्यामुळे छत्तीसगड राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून याविरोधातील तीव्र पाऊले उचलत आहोत. असेही अमित शहा यावेळी म्हणाले. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. या बैठकीत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह आयबी, सीआरपीएफ आणि राज्य पोलीस दलाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान गृहमंत्री अमित शहा आता उपचारांसाठी दाखल केलेल्या जखमी जवानांची रायपूरमध्ये भेट घेत चौकशी करणार आहेत. त्यापाठोपाठ जगदलपूर, बिजापूर आणि रायपूरचा दौरा करणार आहेत.




