ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन
मुंबई : आपल्या सहजसुंदर अभिनयाने चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या जुन्या जमान्यातील अभिनेत्री शशिकला यांचं आज निधन झालं.
त्या 88 वर्षांच्या होत्या. आज दुपारी १२ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे#
कुलाबा येथील निवासस्थानी रविवारी दुपारी 12 वाजता त्यांनी अखेरचा निरोप घेतला. सत्तरच्या दशकात त्यांनी नायिका आणि खलनायिका रंगविल्या होत्या. त्यांच्या खलनायिकांच्या भूमिका त्या काळात प्रचंड गाजल्या होत्या. त्यांनी 100 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. शशिकला यांचं संपूर्ण नाव शशिकला जावळकर असं होतं. त्यांचा जन्म १९३२ रोजी सोलापुरातील एका मराठी कुटुंबात जन्म झाला. त्यांच्या वडीलांचा सोलापुरात मोठा कपड्यांचा व्यापार होता. त्यामुळे शशिकला यांचे बालपण अगदी ऐशोआरमात गेले. तीन भाऊ आणि तीन बहिणी, असे त्यांचे कुटुंब. त्यातील शशिकला या जवळकर कुटुंबातील पाचवे अपत्य. पुढे शशिकला यांच्या वडिलांचा व्यवसाय डबघाईला आला. त्यांचे सधन आणि सुखी कुटुंब अक्षरश: रस्त्यावर आले.
१९४७ साली त्यांनी ‘जुगनू’ चित्रपटात दिलीप कुमार यांच्या बहिणीची भूमिका साकारली. तोपर्यंत स्ट्रगल चालूच राहिले. १९६२ सालच्या ‘आरती’ चित्रपटात त्यांना खलनायिकेची भूमिका ऑफर झाली होती. त्यामुळे शशिकला इतक्या दुखावल्या की, त्यांनी यापुढे कधीच चित्रपटात काम न करण्याचे ठरवले. परंतु, चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी तिला खूप समजावून या भूमिकेसाठी राजी केले. दरम्यान, ‘आरती’चित्रपटातील या खलनायिकेच्या भूमिकेमुळे आयुष्याला कलाटणी मिळाली. हरियाली और रास्ता, गुमराह, हमराही, फुल और पत्थर सारख्या चित्रपटात खलनायकाच्या भूमिका त्यांनी बजावल्या. तसेच शशिकला यांनी आपल्या फिल्म करिअरमध्ये सुमारे १०० बॉलिवूड चित्रपटांत काम केले होते. दीर्घकाळापासून त्या फिल्म इंडस्ट्रीपासून दूर राहिल्या.
करिअर बहरत असताना शशिकला यांनी ओम प्रकाश मेहरा यांच्यासोबत त्यांनी प्रेमविवाह केला. शशिकला यांना दोन मुलीही झाल्या. पण, कालांतराने या नात्यात मतभेद वाढले. कौटुंबिक वादामुळे शशिकला यांनी आपल्या मुली, घरदार यांच्यापासून दूर राहणे पसंत केले. एका व्यक्तीसोबत जाऊन त्या परदेशी स्थायिक झाल्या. परंतु, त्या व्यक्तीनेही त्यांना धोका दिला. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, ‘त्या व्यक्तिने मला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. मी कशीबशी त्याच्या कचाट्यातून सुटले आणि भारतात आले. भारतात आल्यावर मी विमनस्क अवस्थेत रस्त्यावर फिरत राहायचे. फुटपाथवर झोपायचे. जे मिळायचे ते खायचे. शांतीच्या शोधात मी अनेक मंदिरे, आश्रम पालथी घातली. यानंतर मी कोलकात्याला गेले आणि येथे मदर टेरेसा यांच्यासोबत रोग्यांची सेवा केली. मदर टेरेसा यांच्यासोबत ९ वर्षे सेवा दिल्यानंतर त्या पुन्हा मुंबईला परतल्या. इथे आल्यावर आपली थोरली मुलगी कॅन्सरच्या आजाराने निधन पावल्याचे त्यांना समजले. मग धाकटी मुलगी आणि नातवंडे यांच्यासोबत त्या राहू लागल्या. नव्याने चित्रपट क्षेत्रात येऊन आपला जम बसवत आजीच्या भूमिका लीलया पार पाडल्या. छोट्या पडद्यावरील किसे अपना कहें, सोनपरी, जिना इसी का नाम है मालिकेत विविधांगी भूमिका साकारल्या.
‘माझे वडील स्वत:ची अख्खी कमाई आपल्या लहान भावाला पाठवत. तो लंडनला शिकत असे. आपल्या कुटुंबापेक्षा आपल्या भावाची ते अधिक काळजी घ्यायचे. पण, त्यांचा हाच भाऊ नोकरीला लागला आणि आम्हाला विसरला. माझ्या वडिलांचा व्यवसाय डबघाईला गेला. तो प्रसंग मला आठवतो. आठ दिवस आम्ही जेवलो नव्हतो. आम्हाला कुणीतरी जेवायला बोलवावे, यासाठी प्रार्थना करत होतो. अशास्थितीत शशिकला सुंदर आहे. अभिनयही चांगला करते, असे अनेकांनी माझ्या वडिलांना सांगितले आणि आमचे कुटुंब मुंबईत आले. त्यावेळी माझे वय ११ वर्षे होते. त्या वयात मी एका स्टुडिओतून दुसऱ्या स्टुडिओत जात काम शोधत होते. याचदरम्यान माझी ओळख नूर जहाँ यांच्याशी झाली आणि त्यांनी त्यांच्या पतीला सांगून मला काम मिळवून दिले’, हा अनुभव त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितला होता.
गाजलेले चित्रपट
‘नौ दो ग्यारह’, ‘कानुन’, ‘जंगली’, ‘हरियाली और रास्ता’, ‘अनपढ’, ‘यह रास्ते हैं प्यार के’, ‘वक्त’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘नीलकमल’, ‘तीन बहुरानियाँ’, ‘हमजोली’, ‘सरगम’, ‘क्रांती’, ‘रॉकी’, ‘बादशहा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी’ (2003) आदी सिनेमात त्यांनी काम केलं आहे. त्या 2005 पर्यंत अभिनय करत होत्या.