अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहांचे लग्न मोडले, पतीवर गंभीर आरोप

कोलकाता : पश्चिम बंगाल आता पुन्हा एकदा चर्चेत आहे. फक्त चर्चेचं कारण राजकीय नसून वैयक्तिक आहे. अभिनेत्री आणि टीएमसीच्या खासदार नुसरत जहां यांचं लग्न अवघ्या दोन वर्षांतच मोडलं आहे. विशेष म्हणजे त्याची घोषणा खुद्द नुसरत जहां यांनी केली आहे. एक वक्तव्य जारी करत लग्न अवैध आणि बेकायदेशीर असल्याची घोषणाच नुसरत जहां यांनी केली आहे. नुसरत जहां एवढ्यावरच न थांबता पती निखिल जैनवर आर्थिक घोटाळ्याचा आरोपही केला आहे.
आश्चर्य म्हणजे नुसरत जहां आणि निखिल जैन यांचं लग्न १९ जून २०१९ ला तुर्कितल्या बोद्रममध्ये झालं होतं. दोन वर्षातच ते नातं संपल्याची घोषणा करण्याची वेळ नुसरत जहां यांच्यावर आली आहे. नुसरत जहां आणि निखिल जैन यांचं लग्न प्रचंड चर्चेत होतं. त्यांच्या लग्नाचे फोटोजही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आज नुसरत जहां यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिलं आहे.
नुसरत जहां यांच्या निवेदनातील दावे :
तुर्की मॅरेज रजिस्ट्रेशन कायद्यानुसार हे लग्न पूर्णपणे बेकायदेशीर आहे. हे दोन वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचं लग्न होतं. त्यामुळे ते स्पेशल मॅरेज एक्टनुसार नोंद होणं गरजेचं होतं. पण ते कधीच झालं नाही. तुर्कीच्या कायद्यानुसार हे लग्न नसून ते एक रिलेशिनशिप होती. फार फार तर त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणता येईल. त्यामुळे तलाक (घटस्फोट) घेण्याचा प्रश्नच नाही.
दोघेही आधीच वेगळं झाल्याचं नुसरत निवेदनात म्हणतात. मी कधीच याबाबत सार्वजनिक स्वरुपात बोललेली नाही. कारण माझं वैयक्तिक जीवन हे स्वत: पुरतच मर्यादीत ठेवू इच्छिते. माझ्या कुठल्याच निर्णयाला ‘अलगाव’ला जोडून बघितलं जाऊ नये. माझं लग्न कधीच कायदेशीर नव्हतं आणि कायद्याच्या नजरेत त्याला लग्न म्हणताही येत नाही.
माझ्या लग्नाबद्दल चर्चा होऊ नये असही नुसरत जहां यांचं म्हणणं आहे. कारण ते त्यांचं वैयक्तिक जीवन आहे. कथित लग्नच बेकायदेशीर होतं. त्यामुळे त्याला इतर गोष्टींशी जोडून बघू नये अशी अपेक्षाही नुसरत जहाँ व्यक्त करतायत.
पती निखिल जैन यांचं नाव न घेता नुसरत जहां म्हणतात, तो व्यक्ती स्वत:च्या श्रीमंत होण्याचे दावे करतो आहे. तसंच त्याचा वापर केल्याचाही तो आरोप करतो आहे. पण वास्तव उलटं आहे. कारण खुप काळापासून माझ्याच अकाऊंटमधून बेयकादेशीरपणे तो पैसे काढतो आहे. माझ्यापासून वेगळं झाल्यानंतरही त्या व्यक्तीनं (निखिलनं) रात्री-मध्यरात्री माझ्या अकाऊंटमधून पैसे काढले आहेत. मी याबाबत पोलीसात तक्रार केलेली आहे.
माझ्या अनेक वस्तू, ज्यात माझ्या बॅग्ज, कपडे आणि इतर गोष्टींचा समावेश आहे, त्या अजूनही या व्यक्तीकडेच आहेत. मला हे सांगताना अतिशय दु:ख होत आहे की, माझे सगळे दागिने जे माझं कुटुंब, मित्र, नातेवाईकांनी दिले होते ते अजूनही याच व्यक्तीच्या ताब्यात आहेत.
तुम्ही ‘श्रीमंत’ आहात म्हणजे स्वत:ला पीडित म्हणून सांगू शकत नाही आणि एखाद्या महिलेवर खोटे आरोप करण्याचाही तुम्हाला अधिकार मिळत नाही. मी माझी ओळख मोठ्या मेहनतीतून निर्माण केली आहे आणि माझ्यामार्फत मी कुणाला फेमस होऊ देणार नाही.
माझ्या वैयक्तिक नातेसंबंधाची चर्चा मी कधीच कुणाशी केलेली नाही. लोकांनीही अशी चर्चा करु नये. मी मीडियालाही आवाहन करते की, ज्या व्यक्तीपासून मी खुप काळापुर्वीच वेगळी झाली आहे, त्याला ‘हिरो’ म्हणून सादर करु नये.




