मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर पेट्रोलने भरलेली बाटली फेकली; घातपाताची शक्यता !

मुंबई : १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन दोन दिवसांवर आला असून देशभरात गुप्तचर यंत्रणा काही घातपाताचा घटना घडून नये म्हणून कंबर कसत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील सीएमएमटी रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याच्या खोट्या माहितीनंतर दहशतीचे वातावरण निर्माण झालं होतं. ही घटना ताजी असतानाच, आता दहशतवादी कृत्याची आणखी एक घटना समोर आली आहे. काल सायंकाळी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर एक पेट्रोलनं भरलेली बाटली फेकण्यात आली आहे. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं काही अज्ञातांनी हे कृत्य केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) अधिकाऱ्यांकडे आहे. या अधिकाऱ्यांना बुधवारी रात्री काही संशयास्पद वस्तू धावपट्टीच्या जवळ फेकलेली आढळली. अज्ञातांकडून पेट्रोलची बाटली फेकली असल्याच उघडकीस आले आहे. गावदेवी झोपडपट्टीच्या शेजारील संरक्षक भिंतीवरून काही वस्तू भिरकावल्याचे स्पष्ट झाल्याने सीआयएसएफच्या जवानांनी लागलीच बॉम्बशोधक आणि नाशक पथकाला पाचारण केले होते.
या घटनेने विमानतळावरील कामकाज किंवा उड्डाणांवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सीआयएसएफने याबाबत स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी संरक्षक भिंत परिसर आणि झोपडपट्टी परिसर पिंजून काढूनही संशयितांचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही.