चक्रीवादळाची शक्यता; केरळसह महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा

मुंबई : काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. यासह पुढील काही दिवस अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. यानंतर मुंबई हवामान विभागाचे संचालक के. एस. होसाळीकर यांनी नुकतंच एक ट्विट करून अरबी समुद्रात चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तविली आहे.
होसाळीकर यांनी मंगळवारी केलेल्या ट्विटनुसार, दक्षिण अरबी समुद्रात १५ मे च्या आसपास चक्रीवादळाची शक्यता असून ते चक्रीवादळ उत्तर,पश्चिमकडे सरकण्याची देखील शक्यता आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तर १४ मे पासूनच काही राज्यांना सावधानतेचा त्यांनी इशारा त्यांनी दिला आहे. १४ मे रोजी अरबी समुद्रातील मच्छिमारांना व बोटींना सुखरूप परतण्यासाठी हा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. तर यासंदर्भातील माहिती देताना त्यांनी ट्वीटमध्ये केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनार पट्टी च्या भागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंघावत आहे. या वादळामुळे मॉन्सूनचे प्रवाह सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे. हे चक्रीवादळ ओमानकडे सरकणार असल्याने महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीला धोका नसला तरी याचा काहीसा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मुंबई हवामान विभागाकडून सोमवारी असे सांगण्यात आले की, येत्या ४८ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने १० ते २४ मे दरम्यान महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यासह हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यासाठी येत्या ५ दिवसांसाठी डगडाटासह मुसळधार पाऊस व काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.