गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना आणखी दोन महिने सुरू राहणार

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोदी सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मार्च २०२० मध्ये जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला आता आणखी दोन महिने वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. जेणेकरुन कोरोनाच्या या संकट काळात गरीब आणि वंचित लाभार्थ्यांना अन्नधान्याची कमतरता भासू नये.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना मे आणि जून २०२१ पर्यंत मोफत अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. म्हणजेच मे आणि जून २०२१ या महिन्यांत गरीब लाभार्थी नागरिकांना ५ किलो मोफत धान्य दिले जाणार आहे. या योजनेमुळे जवळपास ८० कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य मिळून त्याचा लाभ मिळेल.
कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशभरात पहायला मिळत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक राज्यांनी कठोर निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. अशा या संकटाच्या परिस्थितीत गरीबांना झळ बसू नये यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आणखी दोन महिने वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. यासाठी केंद्र सरकार २६,००० कोटींहून अधिक रुपये खर्च करणार आहे.




