दहावीची परीक्षा रद्द, मात्र विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत संभ्रमावस्था

मुंबई : दहावी परीक्षा रद्द केल्यानंतर एकतर मूल्यमापन कसे असणार? शिवाय, आता अकरावी प्रवेश नेमके कसे दिले जाणार? त्यासाठीचे निकष कसे असणार? याबाबत विद्यार्थी, शिक्षक, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांसोबत आयसीएसई, सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अकरावी प्रवेश घेताना समानता यावी यासाठी अकरावी प्रवेश परीक्षा सुद्धा घेतली जाऊ शकते का? याची सुद्धा चाचपणी सुरू आहे.
सीबीएसई, आयसीएसई बोर्डाने दहावी परीक्षा रद्द केल्यानंतर राज्यच्या शिक्षण विभागाने सुद्धा दहावी बोर्ड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता या निर्णयाचा अनेकांनी स्वागत केलं असलं तरी यामुळे अकरावी प्रवेश नेमका कसा दिला जाणार? कोणते निकष यामध्ये असणार? असा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण दहावी बोर्ड परीक्षेला राज्यतील १५ लाख विद्यार्थी या निर्णयामुळे पास होणार असतील तर मग नक्कीच यावर्षी नामांकित कॉलेजला प्रवेश मिळण्यापासून ते या पास झालेल्या सर्वांना प्रवेश मिळण्यापर्यत अनेक अडचणी निर्माण होतील
यावर्षी दहावी परीक्षेला जवळपास १५ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. आता अंतर्गत मूल्यमापनात हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होणार शिवाय दरवर्षीप्रमाणे इतर बोर्डाचे (आयसीएसई, सीबीएसई) ५० हजार विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी समाविष्ट होत असतात. अशामध्ये पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या जागांची कमतरता निर्माण होऊ शकते शिवाय, नामांकित कॉलेजसाठी अनेक अडचणी निर्माण होतील. त्यामुळे परीक्षेचे मूल्यपामन आणि प्रवेश कसे होणार याबाबत शिक्षण विभागाची चर्चा सुरू आहे. आता या अकरावी प्रवेशासाठी ठरवल्या जाणाऱ्या निकषांमध्ये प्रवेश परीक्षा व इतर काही निकषांची चाचपणी केली जात आहे. यामध्ये पुढील पर्यायांचा विचार होऊ शकतो
राज्यात अकरावी प्रवेशासाठी सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांना समान न्याय मिळावा म्हणून राज्यभर एकच प्रवेश परीक्षा घेतली जाऊ शकते. अंतर्गत मूल्यमापन करताना सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या अंतर्गत मूल्यपमानाचे निकष बघून राज्यातील बोर्डाच्या विद्यार्थ्यांना गुण देऊन उत्तीर्ण करून अकरावी प्रवेश गुणांच्या आधारे दिला जाऊ शकतो. एसएससी बोर्डच्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांमध्ये समानता आणण्यासाठी बहुपर्यायी परीक्षा घेऊन अंतर्गत मूल्यपमानचा सुद्धा पर्याय विचारत घेतला जाऊ शकतो जेणेकरून त्या गुणांच्या आधारे अकरावी प्रवेश दिला जाईल. नववी आणि दहावी संयुक्त मूल्यपामन करून अंतर्गत गुणांच्या आधारे सुद्धा अकरवी प्रवेश देण्याचा पर्याय विचारात आहे.
दहावी परीक्षा जरी रद्द झाली तरी आता अकरावी प्रवेशाची चिंता आणि संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनात आहे. त्यामुळे मूल्यपामन क्रायटेरिया आणि त्यानंतर अकरावी प्रवेशाचा निकष ठरवताना समान न्याय सर्व विद्यार्थ्यांना मिळेल व हा संभ्रम दूर होईल हीच अपेक्षा करण्यात येत आहे.




