नाशिक रोडच्या के. एन. केला महाविद्यालयाकडून १२५ विद्यार्थिनींची फसवणूक

नाशिक रोड : प्रवेशाच्या नावाखाली तब्बल १२५ विद्यार्थिनींना नाशिक रोड येथील के. एन. केला महाविद्यालयाने गंडा घातल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या विद्यार्थिनींचे वर्ष वाया जाणार आहे.
मुंबई येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठांतर्गत येत अससलेल्या साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के. एन. केला महाविद्यालय नाशिकरोड येथे आहे. येथे ग्रामीण भागातील अनेक मुली शिकण्यासाठी येतात. अनेक महिलांनीही या कॉलेजमध्ये अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे कॉलेज बंद आहे. या महाविद्यालयात जवळपास १२५ या विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला आहे. त्यासाठी प्रत्येकीने प्रवेशाचे साडेचार हजार रुपये भरले आहेत. आता विद्यापीठाकडून परीक्षा सुरू आहेत. मंगळवारी रात्री एका विद्यार्थिनीच्या व्हॉट्सअॅपवर परीक्षेचे वेळापत्रक आले. तेव्हा त्यात कला व वाणिज्य शाखेतील दुसऱ्या व तिसऱ्यात तसेच एम. ए. च्या दुसऱ्या वर्गातील अशा एकूण १२५ जणींचा पेपर होता. या विद्यार्थिनी बुधवारी पेपर देण्यासाठी गेल्या. मात्र, त्यांच्या ऑनलाइन परीक्षेचा कोडच पेपर सुरू होण्यापर्यंत मिळाला नाही. त्यामुळे विद्यार्थिनींनी विद्यापीठात फोन लावले. तिकडून महाविद्यालयात संपर्क साधण्याचे सांगण्यात आले. महाविद्यालयाने पुन्हा विद्यापीठात संपर्क साधण्यास सांगितले. ही टोलवाटोलवी बराच वेळ सुरू होती. शेवटी उशिरा या १२५ विद्यार्थिनींचा प्रवेशच झाला नसल्याचे विद्यापीठाकडून कळविण्यात आले. हे समजताच अनेक विद्यार्थिनींनी रडायला सुरुवात केली. एक तर वर्ष वाया गेले आणि दुसरीकडे फीचे पैसे बुडाले. याबाबत विद्यार्थिनींनी प्राचार्यांशी संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.
खरे तर या साऱ्या विद्यार्थिनी पेपर देण्यासाठी म्हणून आल्या होत्या. मात्र, त्यांना पेपर संपेपर्यंत परीक्षेस बसता आले नाही. या साऱ्या गोंधळात कॉलेजनेही सहकार्य केले नाही. तीन प्राध्यापिका विद्यार्थिनींची समजूत काढायल्या आल्या. मात्र, त्यांनाही हा नेमका प्रकार काय, हे माहित नव्हते. त्यामुळे पेपर देण्याऐवजी विद्यार्थिनींना तीन तास संतापात काढावे लागले. याप्रकरणी प्रभाग सभापती प्रशांत दिवे यांनी विद्यार्थिनींना न्याय मिळवून देऊ. त्यासाठी आंदोलन करू, अशा इशारा दिला आहे.




