राजकारण

संपावरील एसटी कर्मचाऱ्यांवर आजपासून कठोर कारवाईचा बडगा

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी संपावर असलेल्या एसटी कर्मचारी ४१ टक्के पगारवाढ मिळाल्यानंतरही संप मागे न घेतल्याने आता त्यांच्यावर रविवारपासून थेट व कडक कारवाई सुरू होणार आहे.

एकीकडे पगारवाढ व दुसरीकडे कारवाईची भीती यांमुळे सुमारे ६ हजार कामगार शनिवारी कामावर रुजू झाले. त्यामुळे कामावरील कामगारांची संख्या १८ हजारांवर गेली आहे. त्यामुळेच शनिवारी दिवसभरात राज्यात ९३७ बसगाड्या धावल्या.

देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली आहे. मात्र ही वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. खोत आणि पडळकर यांनी माघार घेतल्याने १८,०९० कर्मचारी कामावर रुजू झाले असून, ७४,१७६ कर्मचारी अद्यापही संपात सहभागी आहेत. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांसाठी १५ दिवस माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी विलीनीकरण झाल्याशिवाय आझाद मैदानातून जाणार नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र दोन दिवसात त्यांच्या भूमिकेत बदल झाला, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

कोल्हापूर, सांगली, बीड आणि अहमदनगर जिल्ह्यात बससेवा अंशत: सुरू झाली असून शेवगाव (अहमदनगर) बसवर दगडफेक झाली. शनिवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ९३६ एसटी धावल्या. त्यातून १३,००७ प्रवाशांनी प्रवास केला. यात ४९ शिवनेरी, १५८ शिवशाही, ९ हिरकणी आणि ७२९ साध्या बसचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button