कोरोनाने आई-वडील गमावलेल्या मुलांचे पालकत्व स्वीकारा; सोनिया गांधींचे पंतप्रधानांना पत्र

नवी दिल्ली: भारत सध्या कोरोनाविषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सामोरा जात आहे. देशभरात आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त व्यक्तींनी कोरोनामुळे जीव गमावलेला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एक मागणी केलेली आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे दोन्ही पालक म्हणजेच आई-वडील गमावले किंवा त्यांच्या घरातील कमावत्या पालकाचे निधन झाले आहे, अशा विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या नवोदय विद्यालयांमध्ये मोफत शिक्षण दिलं जावं, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.
कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही पालक म्हणजेच आई-वडील किंवा त्या घरातील कमावत्या पालकाचे निधन झाले आहे. त्यांना आपण नवोदय विद्यालयांमध्ये मोफत शिक्षण द्यावं, याद्वारे आपण देश म्हणून सध्या त्यांच्यावर आलेल्या दुःखद प्रसंगात आशेचा किरण निर्माण करू शकू, असं सोनिया गांधी म्हणाल्या. त्यासोबतच यामुळे आपण त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी देखील प्रयत्न करू शकतो असं सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवले आहे.
कोरोना विषाणू संसर्गामुळे हृदयद्रावक प्रसंग आपल्याला पाहावे लागत आहेत. अनेक कुटुंब दुखद घटनांचा सामना करत आहेत. काही मुलांनी त्यांच्या दोन्ही पालकांना किंवा एका पालकांना गमावलं आहे. ही या महामारीमधील दुखद बाब आहे. या मुलांवर मोठा आघात झालेला आहे. त्यांना आता भविष्य आणि शिक्षणाबाबत आधार राहिलेला नाही, असं सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.




