
मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असताना कोरोनाचे निर्बंध शिथिल होणार का? असा प्रश्न आता प्रत्येकजण विचारत आहे. या संदर्भात आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे घोषणाच केली आहे. राज्यातील दुकानांना रात्री ८ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र, त्यासोबतच, ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या जास्त आहे, तिथं तेच नियम लागू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीसांगली येथील पत्रकार परिषदेत कोरोनाचं संकट अद्याप आहेच. त्यामुळे, पूरग्रस्त भागात आपण आणखी टेस्ट वाढविणार आहोत, डॉक्टरांचे कॅम्प लावणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यावेळी, दुकानाच्या वेळा वाढवून द्या, अन्यथा दुकाने उघडू असा व्यापाऱ्यांनी इशारा दिला आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आलो होता. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच उत्तर दिलं. अशा धमक्यांना मी मनावर घेत नाही. कारण, माझ्यासमोर माझ्या नागरिकांच्या जीवाची चिंता आहे. जीव वाचविण्यासाठी जेव्हा धावपळ करावी लागते. राज्यात १२५० ते १३०० मेट्रीक टन ऑक्सिजन आपण उत्पादीत करू शकतो. जेव्हा दुसऱ्या लाटेत १७०० मेट्रीक टन ऑक्सिजन लागत होता. म्हणजे ५०० मेट्रीक टन ऑक्सिजन आपल्याला लागत होता. हे आणणं खूप कठीण होतं, इथे कोणी मदतीला येत नाही. मी व्यापाऱ्यांच दु:ख, वेदना समजू शकतो, पण त्यावेळेला कुठलंही ऑक्सिजनचं दुकान उघडं नव्हतं. म्हणून मला ही काळजी घ्यावी लागते.
नागरिकांचे जीव वाचवणं हे महत्त्वाच आहे, त्यामुळे मला ही काळजी घ्यावी लागते. पुढच्या लाटेत दुसऱ्या लाटेपेक्षा दुप्पटीने ऑक्सिजन लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, कोविड नियमांचं पालन बंधनकारक आहे. आज आपण एक आदेश काढत आहोत, दुकानाच्या वेळा रात्री ८ पर्यंत करणार आहोत. मात्र, ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होत नाही, तिथं रुग्णसंख्या जास्त आहे, तिथं पूर्वीचेच नियम व बंधन लागू राहतील, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.




