धनगर समाजाचीही फसवणूक केली, आता आरक्षणाच्या विषयावर किती राजकारण करणार?
देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांचा सवाल

मुंबई: माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देईन, अशी गर्जना करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला हाणला. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असेच वक्तव्य केले होते. ते मला चांगले आठवत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये, असे संजय राऊत यांनी म्हटले.
ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या काळातही रस्त्यावर उतरून करण्यात आलेल्या भाजपच्या ओबीसी आंदोलनाविषयी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलिसांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले.
यावेळी संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाकडून करण्यात आलेल्या कारवाईवरही टीका केली. विरोधी पक्षाने जबाबदारीनं वागावं अशी या जनतेची अपेक्षा आहे. पण जर ती जबाबदारी पाळत नसाल तर आपण जनतेला ज्ञान देण्यात अपुरे पडत आहोत. आपल्यात काही कमतरता आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. चुकीच्या पद्धतीने कारवाया होत आहेत. सत्ता गेल्यावर ज्यांना निराशा आली आहे त्याने नैराश्यातून आणि वैफल्यातून अशा प्रकारच्या चौकशीचा ससेमिरा मागे लावला जात आहे. सत्ताधारी पक्षातल्या प्रमुख नेत्यांवर ठरवून कार्यवाही केली जाते. केंद्रीय पथके येथे येतात आणि कोणाच्या दबावाखाली येथे येऊन कार्यवाही करतात हे संघराज्य पद्धतीला हानीकारक असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडलं. नागपूरमधल्या आंदोलनात फडणवीसांना ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. खास करुन त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. ओबीसी आरक्षणाचा मारेकरी काँग्रेसच आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय. पण माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं फडणवीस म्हणाले होते.