Top Newsराजकारण

शरद पवार – उद्धव ठाकरेंच्या भेटीमुळे चर्चेला उधाण

मुंबई : राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘वर्षा’ बंगल्यावर पोहोचले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर सक्तवसुली संचलनालयाकडून टाकलेले छापे, त्यांना चौकशीसाठी बजावण्यात आलेलं समन्स या पार्श्वभूमीवर पवार-ठाकरेंची भेट महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळेदेखील उपस्थित आहेत.

याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गेल्या तीन दिवसात दोनदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी काल राऊत वर्षा बंगल्यावर पोहोचले होते. या भेटीनंतर राऊत लगेचच सिल्व्हर ओकवर गेले. तिथे त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. राऊत यांच्या या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.

१०० कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणाच्या आरोपावरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत सापडले आहेत. अनिल देशमुख यांनी ईडीकडे उपस्थित राहण्यासाठी त्यांनी ७ दिवसांची मुदत मागितली आहे. आम्ही कायद्यानुसार पुढे जात आहोत, तुम्हाला आवश्यक असलेली कागदपत्रं आम्ही देणार आहोत असं, अनिल देशमुख यांच्या वकिलांनी सांगितलं आहे. देशमुखांची प्रकृती ठीक नसल्यानं त्यांनी काही सवलत मागितल्याचं वकिलांनी सांगितलं आहे. देशमुख यांचे दोन्ही स्वीय सहाय्यक ईडीच्या अटकेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button