
नवी दिल्ली: वाराणासीतील डॉक्टरांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काल भावूक झाले होते. त्यावरून मोदींवर टीका होऊ लागली आहे. ‘आप’चे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनीही पंतप्रधानांवर टीका केली आहे. निवडणुका संपल्यावर मोदी चॅनेलवर येऊन रडतील हे मी आधीच सांगितलं होतं, असं संजय सिंह यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या भाकिताचं ट्विटही त्यांनी व्हायरल केलं आहे.
आपचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी त्यांचं १७ एप्रिलचं ट्विट शेअर करत मोदींवर टीका केली आहे. मी १७ एप्रिल रोजी जे बोललो होतो, ते २१ मे रोजी खरं ठरलं. देशाला एका संवेदनशील आणि नेक व्यक्तीची गरज आहे. ढोगी पंतप्रधानांची नाही. स्वत: रॅली करून कोरोना फैलावायचा आणि नंतर रडण्याचं नाटक करायचं, अशा व्यक्तीची गरज नाही, असं संजय सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सिंह यांनी १७ एप्रिल रोजी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्याचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या पत्रकार परिषदेत ते मीडियाला उद्देशून बोलत आहेत. तुम्ही थोडी कळ सोसा. लवकरच लाईट, कॅमेरा आणि अॅक्शन सुरू होणार आहे. फक्त थोडी वाट पाहा. ते टीव्हीवर येऊन रडतील. त्यानंतर संपूर्ण देशातील वृत्तवाहिन्या ही बातमी चालवतील. सर्व भावूक झाले… सर्व रडायला लागले… केवळ टाळ्या-थाळ्या वाजवा… खरच देशाचं भलं व्हावं वाटत असेल तर आता या प्रकारातून आपल्याला बाहेर पडावं लागेल, असं सिंह या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.
जो 17 अप्रैल को बोला था
21 मई को सच हो गया।
देश को एक संवेदनशील नेक दिल इंसान चाहिये
ढोंगी प्रधानमंत्री नही जो खुद रैली करके कोरोना फैलाए और बाद में रोने का नाटक करे। pic.twitter.com/lDvQQmvlmw— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) May 21, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणासीतील डॉक्टरांशी संवाद साधला होता. आपली लढाई एका अदृश्य आणि धूर्त शत्रूविरोधात आहे. सतत बदलणाऱ्या या शत्रूमुळे आपल्याला सावध राहिलं पाहिजे. लहान मुलांना वाचवणं आवश्यक आहे. त्यासाठी पावलं उचलली पाहिजेत, असं सांगताना मोदी भावूक झाले होते. यावेळी त्यांनी ब्लॅक फंगसपासून सावध राहण्याच्या सूचनाही दिल्या. या आजारापासून सावध राहून अॅक्शन घ्यायची आहे. संकटाच्या काळात काहीवेळा लोकांची नाराजीही ओढवते. मात्र, तरीही आपल्याला काम करत राहायचं आहे. त्यांचं दु:ख कमी करायचं आहे, असा सल्लाही त्यांनी दिला होता.




