खट्याळ मुलं पण शांत होतात, पण भाजप नेत्यांचा थयथयाट थांबत नाही!
महापौर किशोरी पेडणेकर यांचा पलटवार

मुंबई : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या कोरोना लढाईचं कौतुक केलं आहे, तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे नेते आणि भाजपचे महाराष्ट्रातील नेते यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यामध्ये आता देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, प्रवीण दरेकर यांच्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही या वादात उडी घेतली आहे.
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकारवर टीका करत असताना, सरकार कोरोना संबंधित खरे आकडे लपवत असल्याचा आरोप केला होता. याच वक्तव्याचा समाचार घेताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आहे. त्यांनी म्हटलं की, आम्ही कोरोनासबंधित आकडे लपवण्यात तरबेज नाहीत, जे लपवतात त्यांना तो लखलाभ. त्या पुढे म्हणाल्या की, खट्याळ मुलं पण कधीतरी शांत होतात. पण यांचा थयथयाट कायम सुरूच असतो. आमच्या कामाची उंची त्यांना सहन होत नाही. त्यामुळे त्यांना नेहमी पोटदुखी होते आहे. आम्ही जे करतोय ते जनता पाहत आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. उद्धव ठाकरेंच्या कामाचं नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं असताना, महाराष्ट्रातील भाजपचे नेते स्वतः च्या पंतप्रधानांना देखील खोटं ठरवत आहेत का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यासोबतचं लसीकरण अॅप सांभाळण्याची परवानगी आम्हाला द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
खरंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फोन केला होता. यावेळी त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढा देत असताना राज्य सरकारने चांगल्या उपाययोजना केल्यात, असं म्हणत कौतुक केलं होतं. तर दुसरीकडे, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उजेडात येऊ न देणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून कोरोना संकटाची सत्य स्थिती निदर्शनास न येता लढ्यात बाधा उत्पन्न होत आहे, असा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं.




